ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.459
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४५९
पंढरीचे वाटे अनंत घडती याग । वैकुंठीचा मार्ग तेणे संगे ॥१॥ जप तप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म । हे जाणताती वर्म संतजन ॥२॥ भक्तिमार्ग फुकटा आनंदाची पव्हे । लागलीसे सवे पुंडलिका ॥३॥ दिंडी टाळ घोळ गरूडटकियाचे भार । वैष्णवांचे गजर जिये नगरी ॥४॥ तिहीं लोकी दुर्लभ अमर नेणती । वृक्ष होऊनि पुढती सेविताती ॥५॥ सनकादिक मुनी ध्यानस्थ पै सदा । ब्रह्मादिका कदा न कळे महिमा ॥६॥ ज्ञानदेव निवृत्ति पुसतसे कोडें । पुंडलिके केवढे भाग्य केलें ॥७॥
अर्थ:-
क्षेत्र पंढरपूरास निघालेला भाविक मनुष्य नामस्मरण करीत करीत वाटेने चालला असतां त्याच्या चालण्यामध्ये पावलोपावली यज्ञ घडत असता व त्या यज्ञापासून होणारी पुण्याई त्याला मिळते. त्यामुळे वैकुंठप्राप्तीचा मार्ग त्याला सुलभ होतो. जप, तप, अनुष्ठान, क्रिया, कर्म, धर्म हे सर्व पांडुरंग आहे. असे साधु संतच जाणतात. सत्संगती मुळे भक्तिमार्गाची वाट सुलभ रितीने प्राप्त होऊन त्यास ब्रह्मानंद प्राप्तिचा सुकाळ होतो. अशी सवय पुंडलिकरायाला लागली होती. विणा, टाळ मृदंग, गरूडटके घेऊन वैष्णवांचा मेळा पंढरपूर क्षेत्रामध्ये आनंदाने भगवत नामाचा गजर करीत असतो. तो आनंद स्वर्गातील इंद्रादिक देवाना देखील फार दुर्लभ आहे. तो आनंद आपल्याला मिळावा म्हणून देव पंढरीक्षेत्रामध्ये वृक्ष होऊन राहिलेले आहेत. सनकादिक मुनी पंढरीक्षेत्रा मध्ये ध्यान करीत बसलेले आहेत भगवत नामाचा महिमा ब्रह्मदेवादिकांस देखील कळणे कठीण आहे. पुंडलिकरायांनी आज केवढे मोठे भाग्य संपादन केले आहे की आज परमात्मा त्यांना लाभला आहे. असे निवृत्तीरायांना माऊली ज्ञानदेव कौतुकाने विचारत आहेत.