ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.444
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४४४
ऐका हा शेवट अभंगमाला झाली । तुर्या हेच आली प्रत्यया गा ॥१॥ तुर्या तेचि उन्मनी क्षर ते अक्षर । निर्गुण साकार ऐसें देखा ॥२॥ देह ते विदेह महाकारण ब्रह्मा । हे निश्चयाचे वर्म ऐसे जाणा ॥३॥ अभंगा शेवट जाणे निवृत्ती एक । त्याने मज देख कृपा केली ॥४॥ मुर्खासी हा बोध सांगो नये बापा । अभंग कृत्याचा लेश नसो हातीं ॥५॥ ज्ञानदेव म्हणे हे कृत्य हातां नये । माय देऊ नये कोणासही ॥६॥
अर्थ:-
योग प्रकरणातील हा शेवटचा अभंग आहे. या अभंगमालेमुळे चवथी जी अधिवस्था तिचा अनुभव आला. त्या अवस्थेत मनाचा मनपणा राहात नाही. म्हणुन हिला उन्मनी अवस्था असे म्हणतात. क्षर म्हणजे नाशवंत व अक्षर म्हणजे परमात्मा त्या क्षर पदार्थाला अक्षररूप परमात्मा अधिष्ठान आहे असे कळले म्हणजे क्षर हे अक्षर स्वरूपच ठरते. यावरून निर्गुणच सगुण बनते. या देहातच ज्ञानप्राप्त होऊन विदेही अवस्था प्राप्त होते. महाकारण देहांतच ब्रह्म साक्षात्कार होत असल्यामुळे त्या देहाला ब्रह्म म्हणण्याची पद्धत आहे. हे निश्चयाचे वर्म आहे असे जाणा. हे योगाभ्यास वर्णनाचे अवघड अभंग निवृत्तीनाथांच्या कृपेनेच शेवटास गेले, ज्याला या अभंगाच्या ज्ञानाचा अनुभव नाही त्याला हा बोध सांगु नये. जसी आपली आई कोणत्याही दुष्टाचे स्वाधीन करीत नाही. त्याप्रमाण मुर्खांना हा बोध करू नये. अनधिकारी मनष्यांना या ज्ञानाचा स्पर्शदेखील होऊ देऊ नये असे माऊली ज्ञानदेव सांगतात.