ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.350
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३५०
त्रिगुणाचे मूळ सत्रावीच स्वर । उन्मनीचें बीज जाण रया ॥१॥ शुन्य ब्रह्म पूर्ण चक्षुचे अंतरीं । निर्विकार निरंजन तोचि तें गा ॥२॥ सूर्य चंद्र दोनी प्रकाशले साजिरे । त्रिकुट संचरे अनाठसा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तिप्रसादें । राहा रे निजबोधें निरंतर ॥४॥
अर्थ:-
सहस्त्रदळातील ब्रह्मरंध्रात योगी आत्मप्राप्ती करुन घेतात तेच त्रिगुणांचे मुळ व सतरावीचे सार आहे. उन्मनीचे बीज आहे. हेच बीज डोळ्यात व हृदयात प्रगटते. तेच निर्लेप व निर्विकार ब्रह्म आहे. ज्याच्यामुळे चंद्र व सुर्य प्रकाशमान होतात. ज्याच्यामुळे त्र्यैलोकाचे व्यवहार होतात अशा परमात्म्याचा निवृत्तिनाथांच्या कृपेने बोध करुन आनंदात रहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.