ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.339
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३९
राज्यपद गाढा पदपाद नसतां । हरिनामीं वसता सर्वपद ॥१॥ पदाभिमानु कांहीं तोही देहीं नाहीं । आला गेला ठायीं न संपडे दृष्टी ॥२॥ ब्रह्मानंद आशापाश तोडीं । दाऊनी ऊघडी मूर्ति आम्हां ॥३॥ ज्ञानदेवी सोहं मंत्राचे आवर्तन । मदमत्सरभान विराले देही ॥४॥
अर्थ:-
श्रीहरिच्या पाऊलाची सोय हाती नसता राज्य प्राप्त झाले असले तरी त्या पासुन मोठा अभिमान उत्पन्न होतो. आणि हरिनामाचे ठिकाणी बुद्धिची वस्ती झाली असता सर्व पदांची प्राप्ती होते. हरिनामाने कोणत्याही पदाची प्राप्ती किंवा निवृत्ति झाली असता त्याचा अभिमान देहांत राहात नाही म्हणजे प्रतिष्ठा रहात नाही. हे ईश्वरा, ब्रह्मानंदाच्या आशेच्या पाशाची बेडी तोडून तू आपली सगुण सुंदर मूर्ति आम्हाला दाखव. सोहं’ मंत्राचे सतत आवर्तन केल्यामुळे आमच्या ठिकाणचे मदमत्सराचे भान सहजच निघून गेले.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.