ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.336

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३६

कितिये स्तुती स्तवने । स्तविती स्तोत्रे विधि गुणें । विधि ते कर्म करणे । परी नेणती मार्गु । अकर्मी विकर्मी । जगी शब्द म्हणती । हा ब्रह्म कर्माचा भागु । शेखीं ब्रह्मकर्म तो योगु । चुकले पंथ शेखीं । ब्रह्म तें तूंचि आतां । सगुण हृदयीं धरुनी । अनु नातळे वाणी रया ॥१॥ तुझा गोपवेश हृदयीं सौरसु । मज सुखाचें सुख निजप्रेम देई रया ॥धृ॥ म्हणोनी यज्ञ यज्ञादिकें तपे व्रतें अटणें । बहुविधि अनेकें पंचाग्नि गोरांजने । सुखे करिती विधी द्वादश अग्नि जळवास । ऐसा धरुनी हव्यास परी ते चुकले कार्यसिद्धि । तुझे भजन सगुण मज प्रिय गा दातारा । अनु न लगती मजलागी आधी रया ॥२॥ बापरखुमादेविवरा । उदारा सोईरा । सगुण गुणाचिया । निर्धारा गुंतल्या येसी । मना पुरली हांव । विश्वी अळंकाराला देव । कीं दिठी न विकारें अनुध्यासीं । येणे निवृत्तिरायें खुणा दाऊनी । सकळ सुखीं सुखवोनि ठेलें । निजध्यासी रया ॥३॥

अर्थ:-

निर्गुण परमात्म्याचे ज्ञान नसता कित्येक लोंक विधीयुक्त स्तुति, स्तोत्रे स्तवनादिकांने स्तुति करतात. कित्येक विधियुक्त कर्म करितात. परंतु त्यांना तुझ्या प्राप्तीचा यथार्थ मार्ग समजत नाही. हा कर्म करणारा आहे, हा कर्म करणारा नाही, कर्म करणे हा एक ब्रह्मप्राप्तीचा उपाय आहे. असे जगातील लोक म्हणतात, पण तेही ब्रह्मप्राप्तीचा मार्ग चुकलेले असतात. शेवटी विचार केला तर सर्व जगदाकार ब्रह्म ते तू आहेस, असा निश्चय होण्याकरिता सगुण परमात्मा हृदयामध्ये धारण करुन वाणीने नामोच्चाराशिवाय कोणत्याही शब्दाचा उच्चार न केला तर सर्व सुखाचे अधिष्ठान असलेला जो परमानंद त्याने तुला आत्मत्वाने प्रेम देईल हा मुख्य सिद्धांत आहे. तो चुकल्यामुळे यज्ञादिक व्रते, तपे करून अनेक प्रकारे शरीराची आटणी करुन घेणे त्याचप्रमाणे अनेक लोक विधिमार्गने पंचाग्नी, गोरांजने आनंदाने करतात. त्याच प्रमाणे बारा वर्षे अग्निवास किवा जलवास करण्याचा हव्यास धरुन श्रम करतात खरे, परंतु मुख्य कार्यसिद्धी प्राप्त करून घेण्यात ते चुकतात. हे दातारा मला तुइया सगुण रूपाचे भजन करण्यात अतिशय आनंद वाटतो. दुसरे मला काहीही आवडत नाही. माझा बाप, व रखुमाईचे पती जे उदार, सखा, जो सगुण श्रीविठ्ठल त्याच्या अनंत गुणांच्या विचारात मन गुंतल्यामुळे त्याची हाव परिपूर्ण झाली. आणि सर्व विश्व देव अलंकारला आहे म्हणजे बनला आहे. या निजध्यासांनी दृष्टीत बदल होत नाही. ही खुण मला निवृत्तिरायांनी दाखवून त्या सुखरूप परमात्म्याचे ध्यानामध्ये मला सुखी करुन ठेवले आहे.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *