ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.335
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१० वे, देवापाशी मागणे अभंग ३३५
आठवी तंव तूंचि जवळिकें । नाठविसी तरी निजसुखें । आठव ना विसरु पाहे तंव । सगुणचि हृदयीं एक रया ॥१॥ तुझ्या नामाचा आठऊ रुपाचा आठऊ । ध्यानाचा आठऊ असो मना ॥२॥ विसरु पडो संसाराचा । आठऊ हो तुझिया रुपाचा । येथे नामरुप ठसा हृदयीं राहो ॥ जिवाचिया जिवलगा । माझिया श्रीरंगा । गोडी घेऊनियां द्वैत नाहीं पाहो रया ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला सगुणीं सुमनी गुंफिलें । प्रीति आवडे तों कोंदाटलें । सुमनी हें विरालें ॥४॥ जालीं नामरुपी ऐक्यभेटी । नामरूप सार जाणोनी । जीवन संसारा जाली तुटी रया ॥५॥
अर्थ:-
हे श्रीकृष्णा तू स्वरुपाने अंतर्यामी असला तरी ज्या कोणी एखाद्याने तुझे स्मरण केले तर तू त्याच्या जवळच उभा आहेस आणि दुस-या एखाद्याने तुझे स्मरण न केले तरी तू आपल्या स्वरुपाने असतोच, तुझ्या स्वरुपदृष्टीने पाहिले तर स्वरुपाच्या ठिकाणी आठव आणि विसर हे दोन्ही नाहीत. व तुझे चिंतन करु पाहिले तर तुझी सगुण मूर्ति मात्र हृदयामध्ये येते.म्हणून तुझ्या नामाचा, स्वरुपाचा आणि ध्यानाचा नित्य आठव मनामध्ये असावा.आणि संसाराचा मात्र विसर व्हावा, माझ्या जीवाच्या जीवा श्रीरंगा या जन्मामध्ये तुझ्या रुपाचा आठव राहून मनामध्ये तुझे रुप नित्यराहो आणि त्या तुझ्या सगुण रुपाची गोडी घेऊन दुःखरुपी द्वैत, डोळे पाहोत. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठला तुझी सगुण मूर्ति जर मनामध्ये राहीली तर ते मनच मनपणा विसरुन जाऊन तुझे रुपच होईल भाविक लोक तुझ्या नामाचा उच्चार करतात. परंतु तुझे व तुझे नामाचे ऐक्य आहे हे त्यांना माहित नसते. परंतु ज्या भक्तांना नाम रुपाच्या एकत्वाचे ज्ञान होऊन तुझी भेट होते. त्या भक्तांना तुझे नाम व रुप हेच जीवनाचे सार आहे असे जाणले असता त्यांच्या संसाराची निवृत्ती होते असे माऊली सांगतात.