ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 539
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५३९
मी देही म्हणतां ब्रह्महत्त्या कोटी । येऊनियां पाठी थापटिती ॥१॥ शुद्ध ब्रह्मीं कैशी कल्पना आरोपी । तोचि एक पापी जगीं होय ॥२॥ नाथिलें अज्ञान करून अनंता । केवीं मोक्षपंथा जाईलजे पां ॥३॥ ज्ञानदेव म्हणे दिव्य मी देईन । सद्गुरूची आण स्वयंब्रह्म ॥४॥
अर्थ:-
मी देह आहे असे म्हटले असता लागलीच कोट्यवधी ब्रह्महत्त्या येऊन तुला शाबासकी देतील. अरे वेड्या, शुद्ध ब्रह्माच्याठिकाणी देह काय, पाप काय,इत्यादिकांचा कसला आरोप करतोस. असा आरोप करणारा तो जगात एक पापी आहे असे समज. परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान नसताना त्या परमात्म्याच्या ठिकाणी जो अज्ञान मानतो तो मोक्षमार्गाला प्राप्त कसा होईल. या सत्यगोष्टीच्या खात्री करता मी वाटेल ते दिव्य करण्यास तयार आहे. श्रीगुरूची शपथ वाहून सांगतो की जीव स्वतः ब्रह्मरूपच आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.