ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 524
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५२४
सिंहाचे दुग्ध सायासें जोडलें । आणुनी पाजिल मार्जाराशी ॥१॥ अमोलिक विद्या धन झाली प्राप्ती । पहावया प्रतीति स्वशीस छेदी ॥२॥ अनेक दीप लाविले दीपाशीं । फुंकूनिया त्यासी मग सोडी ॥३॥ परीस जोडुनी घालियाली भिंती । शिळा घेऊनी हातीं फिरत आहे ॥४॥ अमृताचा कुंभ बळेंचिं उलंडूनी । कांजिये भरूनी ठेवितसे ॥५॥ अमोलिक देहीं न साधा जरी पर । म्हणे ज्ञानेश्वर व्यर्थ होय ॥६॥
अर्थ:-
मोठ्या प्रयासाने मिळविलेला मनुष्य देह तो परमार्थ न करता व्यर्थ घालविणे म्हणजे कष्टाने सिंहीणीचे दूध मिळवावे व ते एखांद्या मांजराला पाजावे त्याप्रमाणे आहे.किंवा एखाद्याने कष्टाने विद्या अथवा धन मिळवावे व त्या धनाचा उपभोग घेण्याऐवजी आपले शीर तोडून घ्यावे. अथवा सायासाने दिवे लावावे. व आपणच फुकून मालवून टाकावे. अथवा परीस मिळाला असता तो दगड समजून भिंत बांधण्याला त्याचा उपयोग करावा किंवा दगड म्हणून हातात घेऊन फिरावे. अमृताने भरलेली घागर लवंडून देऊन तिच्यामध्ये भाताची पेज भरून ठेवावी. या वरील गोष्टी करणेे मूर्खपणाचे आहे. मोठ्या भाग्याने प्राप्त झालेल्या मनुष्यदेहाचा जर परमात्म प्राप्ती करता उपयोग केला नाही. तर त्याचा जन्म व्यर्थ होय. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.