चारधाम पदभ्रमण यात्रा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, व हेमकुंड साहेब भाग – २

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पुष्प – २

हरिद्वारहून पहाटे ५ वाजता ऋषिकेश ला प्रमाण केले.

पहाटे लवकर उठून आवरून, सॅक भरली. धर्मशाळेत एक लखनऊ चा बारा तेरा वर्षाचा मुलगा काम करत होता. छोटू त्यांचे नाव. अगदीच कोवळा मुलगा होता. बिचाऱ्याला या वयात काम करावे लागत होते, हे पाहून वाईट वाटले. अशा परिस्थितीत सुद्धा तो हसत मुख होता. त्याला चहा सांगितले चहा आणून दिला, साबण कुठे मिळते विचारले तर साबण आणून दिला‌ चार हेलपाटे मारले आधार कार्डची झेरॉक्स मिळावी म्हणून… जे सांगेल ते काम विना तक्रार करत होता. त्याला म्हणालो, उद्या पहाटे निघायचे आहे. ५ वाजता दरवाजा उघडावा लागेल म्हणून तुला सांगून ठेवलं. मी दरवाजाजवळच्या खोलीत झोपतो. तुम्ही मला कधीही हाक मारा. मी दरवाजा उघडेन, काळजी करू नका, असे तो उत्तरला. दरवाजा आतून लॉक केल्यामुळे त्याला उठवण्याशिवाय पर्याय नव्हता. पाच वाजता निघताना त्याला झोपेतून उठवले. त्याने दरवाजा उघडला त्याला अच्छा केला आणि निघालो.
मजबुरी…या वयातील शहरी मुलं १० हाका मारल्या तरी उठत नाहीत. जबाबदारी मुलांना पोक्त करते. काही पैसे त्याच्या हातात ठेवून निघालो. तेवढेच मी करू शकत होतो.

गल्ली बोळ पार करत गंगामैयाच्या पुलावर आलो. पुलाच्या तोंडाशी सुमारे शंभर फूट उंचीचा एक मोठा केशरी रंगाने रंगवलेला जाडजूड खांब आणि त्याच्यावर त्रिशूल आणि डमरू लावलेले होते. पहाटेच्या वेळी अंधारात त्रिशूल आणि डमरू विशेष लक्ष वेधून घेत होते. पूल ओलांडला आणि हरिद्वार – ऋषिकेश हायवेवर आलो. डाव्या हाताला वळून ऋषिकेश कडे कूच केले.

रात्रभर प्रवास करून आलेल्या लक्झरी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या. एकेक गाडीतून यात्रेकरू उतरून हरकी पोडीच्या दिशेने मार्गस्थ होत होते. मधूनच कार हायवेवरून आत वळत होत्या. चुकून पुढे गेलेल्या मोटारी बिनधास्त राॅंग साईडने येत होत्या. उतरणाऱ्या लोकांना हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी रिक्षा, सायकल रिक्षा यांची गर्दी झाली होती. रस्त्यावर चालणारा मी एकटाच होतो. रस्त्यावर शहरात असल्यामुळे दिवे होते. पण जसजसा पुढे गेलो तसे दिवे बंद झाले. पण तेवढ्यात फटफटू लागले. त्यामुळे हेड लाईट लावावा लागला नाही. पहाटे २० ते २२ डिग्री तापमान होते. आल्हाददायक वाटत होते, परंतु वारं असल्यामुळे थंडी बोचरी वाटत होती.कानाला गार लागायला लागल्यामुळे खिशातून रुमाल काढून कानावर बांधला. टोपी घातलेली होतीच. सर्व सामान पाठीवर सॅकमध्ये ठेवले होते. त्यामुळे दोन्ही हात मोकळे होते.

हरकी पोडी संपल्यानंतर हरिद्वार संपतेच. सीमेवर असलेल्या एका बागेत शंकराची एक भव्य मूर्ती उभी केलेली होती. त्याच्यावर फोकस टाकल्यामुळे मूर्ती अंधारातही दूरवरून सहजच दिसत होती. हरिद्वार नगरीत स्वागत करण्यासाठी आणि हरिद्वार नगरीचे रक्षण करण्यासाठी साक्षात महादेव सीमेवर पहारा देत उभे असावेत असे वाटले. मूर्ती खूप मोहक आहे. मूर्तीचे फोटो काढून पाय उचलले.

चालत असताना रस्त्याला दुकानाच्या हसू येईल अशा पाट्या दिसल्या एका दुकानावर पाटी लिहिली होती मुलाला मुन्नालाल टायर पंचर दुसऱ्या दुकानावर पाटी लिहिली होती, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मिक्साॅलाॅजी…मस्त पुढे निघालो.

रस्त्याने चालताना कधी फूटपाथ तर कधी डांबरी सडकेवरून चालत होतो. मधूनच फूटपाथ गायब, तर कधी ओव्हरब्रीजच्या कामामुळे सर्व्हिस रोड छोटा…कुठे पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी यात्रेकरूंची गाडीत बसायची लगबग सुरू होती.
एक मूर्तीकाराच्या दुकानात छान मूर्ती करून ठेवल्या होत्या. समोरच ठेवलेली भगवान बुद्धांची
मूर्ती जणू स्वागत करीत होती.

आकाश लाल झाले, ७ वाजले होते. दोन तास चालत होतो. चहा पिण्यासाठी थांबलो. चहावाल्याने तंदूर पेटवला होता. एक जण हात शेकत होता. धुळीसाठी लावलेला मास्क उच्छ्वासामुळे ओला झाला होता. तो तंदूर वर गरम केला. मिथुन भाई,( दुकान चालकाचे नाव ) त्याने मस्त, गरमगरम, फक्कड व ग्लासभर चहा आणून दिला. १० मिनिटे विश्रांती झाली. पुढे निघालो.

८ वाजले. पोटात कावळे ओरडू लागले होते नाष्ट्याची व्यवस्था पाहायला हवी होती. परंतु कुठेही टपऱ्या दुकाने रेस्टॉरंट उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती एका ठिकाणी उभा राहून एका मोटरसायकलला हात केला आणि विचारले तेव्हा त्यांनी सांगितले पुढे उजव्या हाताला आत गावात तुम्हाला दुकानात मिळतील तिथे नाश्ता मिळेल रस्ता क्रॉस करून पलीकडे गेलो वाटेत तिथला गावकरी भेटला तो म्हणाला गावातले सगळे दुकाने बंद आहेत समोर दिसणारे दोन स्नॅक्स सेंटर चालू आहे तिथे तुम्हाला नाश्ता मिळेल पुन्हा रस्ता क्रॉस करून समोर गेलो स्नॅक्स सेंटर मध्ये बसलो काय विचारले पराठे ची ऑर्डर दिली पराठे तयार होईपर्यंत घरी फोन करुन पत्नीसह वर्षाला सकाळी निघून तीन तासाचा प्रवास झाल्याचे कळवले आठ वाजेपर्यंत एकूण 13 किलोमीटरचा प्रवास झाला होता पाण्याचा वेग चांगला होता ख्यालीखुशाली कळवून व इतर चर्चा करून चौकशी करून कप्पा वरून फोन ठेवला व पुढे निघालो दोन पराठे त्याच्यावर अमूल बटर एक चहा पाण्याची बाटली एवढ्या सगळ्या चे बिल फक्त एकशे तीस रुपये.

चालताना पुढे एक मोठा ओव्हरब्रीज लागला. तो खूप उंच होता. एवढे चढायला नको, म्हणून मी पुलाच्या सर्विस रोड कडून पुढे जाऊ लागलो. पुढे गेल्यानंतर तो सर्विस रोड पुलाच्या शेजारून जाता जाता डेड एंड झाला होता हे मला नंतर समजले. तसाच पुढे चालत राहिलो. चालताना काय मला काही खरे वाटेना, म्हणून समोरून येणाऱ्या दोघांकडे चौकशी केली की हा रस्ता पुलाच्या तिकडे जातो का ? त्यातला एक जण म्हणाला याच रस्त्याने पुढे जा, तर दुसरा म्हणाला, जानवर का डर हैं, इधरसे मत जाव. पूल चढके पुरसे जाव. मी तसेच पुढे जायचे ठरवले. वाटेत रेल्वे क्रॉसिंग होते. धड रस्ताही नव्हता. कसातरी उड्या मारत,हकसरत करीत पुलाच्या डाव्या हाताला पोहोचलो. काल ज्या धर्मशाळेत मी उतरलो होतो तिथल्या मॅनेजर काकांनी मला आधीच घाबरवुन सोडले होते. पहाटे लवकर निघू नका, वाटेत जंगले प्राणी असतात. त्यामुळे मी पहाटे तीनच्या ऐवजी पाच ला निघालो आणि सकाळी सात वाजले तरी त्या दोघांनी मला जंगली प्राण्यांची भीती घालून आणखीन घाबरून सोडले. तरीही मनाचा हिय्या करून मी पुढे चालत राहिलो. समोरून चालत आलेली एक दोन माणसे मागे गेली. रेल्वे क्रॉसिंग करून पलिकडे गेल्यानंतर वनखात्याचे चेकपोस्ट दिसले. त्यांच्याकडे चौकशी करता ते म्हणाले की, रात्री पुलाखालून प्राण्यांची ये-जा असते आणि आता तर सकाळ झाली त्यामुळे आता प्राणी येत नाहीत. फुकट दोन तास उशीर निघालो, त्यामुळे उन्हात चालावे लागणार होते. कपाळावर हात मारला आणि चालू लागलो. पुलावरून सोडून गेलो असतो तर परवडले असते, इतका वेळ या सगळ्यात गेला होता.

पुढे रस्त्यात ठिकठिकाणी बोर्ड लावले होते. मोतीचूर रेंज, राजाजी टायगर रिझर्व. प्राणी रस्ता ओलांडतात, प्राणी रस्त्यात येऊ शकतात, गाडीतून उतरून नका. हे मी घरी सांगितले असते तर घरच्यांनी मला सकाळी सातच्या आत बाहेर पडू नको सल्ला दिला असता. पण मी निघून इथे येईपर्यंत जवळजवळ दोन तास गेले होते व लक्ख उजाडले होते.

ऊन वाढू लागले होते मी रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला गेलो. आता माझ्या समोरून वाहने येत होती. या बाजूला थोडी झाडी असल्यामुळे थेट ऊन अंगावर येत नव्हते. काही सोनचाफ्याची तर काही अनोळखी झाडे होती. चालताना झाडांची महत्त्व कळते. कितीही कडेने चालले तरी वाहने अगदी शेजारून जात होती. एकूणच पादचाऱ्यांना शून्य किंमत असते.

वाटेत काली कमलीवाले बाबा यांची मोठी गोशाळा लागली. मोठे आवार, सुसज्ज व्यवस्था, खूप गोधन होते. उत्तराखंड मध्ये काली कमलीवाले बाबा यांचे अनेक ठिकाणी आश्रम आहेत. बाहेरच्या मानाने तेथे माफक दरात निवासाची सोय होते.

सावलीमुळे चालणे थोडे सुसह्य झाले. पण ऊन लागायला लागल्यामुळे तहान लागून सारखे पाणी प्यावे असे वाटत होते. सुरुवातीला पाणी प्यायलो,नंतर ज्यूस, उसाचा रस, शहाळे असे करत करत वाटचाल चालू होती. दहा वाजता हायवेवर लावलेली आडवी पाटी दिसली… ऋषिकेश पाच किलोमीटर !!! एक तासात आश्रमात पोहोचू असा विचार केला. गुगल मॅप उघडून स्वामी रामानंद आश्रमाचा पत्ता टाकला तर तो दोन तास पंधरा मिनिटे ची वेळ दाखवत होता. चुपचाप गुगल मॅप बंद केले आणि पाय उचलले.

थोडे पुढे गेल्यानंतर एक स्थानिक नागरिक भेटला. त्याला आश्रमाचा पत्ता विचारलं तर त्यांनी मला नीट पत्ता सांगितला तो म्हणाला पुढे गेल्यानंतर चंद्रभागा ( एक क्षण नाव ऐकून मला आश्चर्य वाटले ) पूल लागेल. तो पूल ओलांडला की उजव्या हाताला वळा आणि मग विचारत विचारत पुढे जा. आश्रम खूप लांब आहे. तुम्हाला रिक्षाने जावे लागेल. त्यावर मी हरिद्वार पासून चालत आलोय सांगितल्यानंतर तो चकित झाला. पण तरीही आश्रम खूप लांब आहे हे सांगणे त्यांनी मात्र सोडले नाही. नंतर माझी चौकशी केली, तुम्ही कुठून आलात कशासाठी चालत आलात वगैरे विचारले माहिती दिल्यानंतर शुभेच्छा देऊन तो त्याच्या वाटेने, तर मी माझ्या वाटेने निघालो. सासूबाई आणि सासरे यांना वाटचालीची माहिती कळविली. त्यांचे आशीर्वाद होतेच. त्यांनी चार धाम यात्रेसाठी त्यांचा सहभाग व शुभेच्छा म्हणून आर्थिक वाटा उचलला. माझ्या या पूण्यकर्मात सर्वांचा वाटा होताच. एकट्याने सगळे थोडेच होते.

चालताना उजव्या हाताला बहात्तर सीडी नावाचा घाट नावाचा घाट लागला. त्यावर मंदिर गंगेश्वर बजरंग महादेव अशी पाटी होती. येथून खाली डोकावल्यावर ऋषिकेश च्या गंगेचे प्रथम दर्शन झाले. दोन मिनिटं उभा राहिलो, फोटो काढले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. ऋषिकेशमध्ये चौकशी करीत रामानंद आश्रमात पोहोचलो. माझे बुलढाण्याचे एक मित्र श्री सुनील वायाळ यांनी त्यांच्या नातेवाईकां मार्फत सदर आश्रमात राहायची सोय केली होती. रजनीकांत, नरेंद्र मोदी हे स्वामी रामानंद यांचे शिष्य. मला पण आपण सेलिब्रिटी झाल्याचा फील आला…

श्री अशोक वायाळ यांची भेट घ्यायची होती.
आश्रमात प्रवेश करून त्यांची चौकशी केली तर ते समोरच उभे. नमस्कार केला. समक्ष भेट आज प्रथमच झाली होती. काल फोन करून मी उद्या १२-१ वाजेपर्यंत पोहोचतो आहे, असे कळवले होते. श्री अशोक वायाळ यांचे वडील ऋषिकेश ला संस्कृत शिक्षणासाठी. त्यांनी पुढे पीएचडी केली व येथेच स्थायिक झाले. स्वामी रामानंद तसेच त्यांचे उत्तराधिकारी विद्यमान स्वामीजीं
यांचे ते अगदी निकटचे सहकारी आहेत. त्यांना अनेक भारतीय भाषा अस्खलितपणे बोलता येतात. अतिशय उमदा माणूस व प्रभावी व्यक्तिमत्त्व. तुम्ही कितीही दिवस राहा, काळजी करू नका असे त्यांनी मला अनेकदा सांगितले.
ऋणानुबंध म्हणायचे…त्यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्स चा व्यवसाय आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा यात्रेकरूंची गर्दी लोटली होती. सगळी लाॅजेस, आश्रम, धर्मशाळा ओव्हरफुल झाली होती. त्यांना कामामुळे उसंत नव्हती.

दुपारचे १२.३० झाले होते. आश्रमाची जेवणाची वेळ झाली होती. घंटा वाजली. आम्ही भोजनासाठी गेलो. सगळा शिस्तबद्ध कारभार…
तांदळाची खीर, मेदू वडे, सांबार, कारल्याची भाजी व ताक… भरगच्च मेन्यू.
हवे तेवढे घ्या, फक्त टाकू नका. जेवण झाल्यावर स्वतः चे ताट, चमचे, भांडे स्वतः स्वच्छ धुवून ठेवायचे. चांगला नियम व शिस्त.

आश्रमात बरेच विद्यार्थी आढळले. यातील काही लहान तर काही प्रौढ ही होते. तीन वर्षांचे वैदिक व उच्च शिक्षण येथे देतात. तरूण संन्याशी ही येथे बरेच आहेत. सायंकाळी तांदळाची खिचडी,कढी, रस्सा भाजी व पोळी असा मेन्यू होता.

या आश्रमात सर्वांना सरसकट प्रवेश मिळत नाही. अनुयायी, शिष्य, विद्यार्थी यांनाच प्रवेश दिला जातो. आश्रम खूप मोठा, स्वच्छ ठेवलेला परिसर असा आहे. शंकराचे मंदिर, स्वामीजींचे समाधी स्थान,यज्ञ शाळा, पाहुण्यांसाठी सुसज्ज व वातानुकूलित खोल्या. मोठे भोजन गृह. पार्किंगसाठी भरपूर जागा.

आश्रमाच्या मागील बाजूस गंगा वाहात असते. त्यावर बांधलेला घाट. सायंकाळी मनोहारी वातावरण असते. लोक पायऱ्यांवर येऊन बसतात. कोणी एकटा येतो, तर कोणी सहकुटुंब.
कोणी ध्यानात मग्न तर कोणी मित्र मैत्रिणींशी हितगुज करण्यात मशगुल. कोणी आरती करून दिले पाण्यात सोडतो तर कोणी पाण्यात पाय सोडून विचारात हरवलेला… कोणी पाण्यात खेळत असतात तर कोणी दुरूनच गंगामैय्याला डोळ्यात साठवत असतात…घाटाच्या पायऱ्यांवर बांधलेल्या रस्त्यावर व्यायाम करणारे, सन्याशांची ये-जा चालू असते…बऱ्याच वृद्धांची मनिषा सफल झाल्याची भावना.

संध्याछाया पसरत असतात, समोर गंगामैय्या संथपणे वाहात असते, कोणीतरी आरती करून सोडलेले दिवे हेलकावे खात पुढे जात असतात, मधूनच एखादा मासा पाण्यावर उडी मारून क्षणात पाण्यात लुप्त होतो, मासे आपल्याशी लपाछपी खेळत असतात… प्रत्येक आश्रमाच्या गंगारती होतात. हा छोटेखानी सोहळा असतो.
चटई पसरून बसलेले भाविक. मंत्र म्हणणारे विद्यार्थी, दीपमाळेला लावलेल्या वाती…उदबत्तीचा सुगंध, वातींचा धूर…

हळूहळू काळोख आपले बाहू पसरतो. उरल्या सुरल्या संधीप्रकाशाला कवेत घेतो. लोक घरी परतू लागतात… मागे उरतो गंगामैय्याचा आवाज, दूरवर दिसणारे मंदिराचे दिवे, साधनामस्तांसाठी उत्तम वेळ… कालचक्र आहे हे…न थांबणारे.
मर्त्य मानव, आज असणारे उद्या नाहीत… निसर्ग मात्र तोच आहे…

गुरुदेव दत्त…
🙏

क्रमशः …

©️ लेखक व वाटसरू
उदय नागनाथ
मोबाईल नंबर ९४२२०८१०८०
udaynaganath@dd819

,

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री पायी यात्रा वर्णन


1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *