ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.995
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके सौरी अभंग ९९५
जोहार मायबाप जोहार । मी कृष्णाजी घरचा पाडेवार । त्याचे घरांतला सर्व कारभार । माझे शिरावर कीं जी मायबाप ॥१॥ कामाजी बाजी हुद्देदार । तेणें रयतेचा केला मार । रयत फार नागविली कीं जी मायबाप ॥२॥ क्रोधाजी बाबा शेखदार झाले । त्याजकडे हुजूरचे काम आलें । तेणें कामाजीचें छळण केलें कीं जी मायबाप ॥३॥ मनाजी बाजी याने फितुर केला । तेणें करोनी मोठा बखेडा झाला । गांव सगळा नाशिला कीं जी मायबाप ॥४॥ बुधाजी पाटील कायापूरचे । ममताईचे हाताखालचे । त्यांत जीवाजी भुलले कीं जी माय बाप ॥५॥ या उभयतांचा विचार वागला । त्यामुळे आम्हांस राग आला । बुधाजी आवरी आपल्या पोराला कीं जी मायबाप ॥६॥ सद्गुरूचा मी पाडेवार । निवृत्तीसी असे माझा जोहार । ज्ञानदेवा सफळ संसार झालां कीं जी मायबाप ॥७॥
अर्थ:-
मी भगवान श्रीकृष्णाच्या घरचा नोकर आहे. त्या श्रीकृष्णाच्या घरांतील कामाची जबाबदारी माझ्या शिरावर असते. काम नावांचा देहराज्यातील एक मुख्य अधिकारी आहे.त्यांने सर्व जनतेला मार देऊन लुबाडले आहे.क्रोध नावांचे दुसरे अधिकारी नेमले आहे. त्याच्याकडे हुजूरचे काम आले. व त्याने कामावर तान मारून मनाजी बाबाला फितुर केले. आणि मोठा बखेडा माजवून सगळ्या गावाचा नाश करून टाकला आहे. या कायापूरचे पाटील बुद्धि असून ममतेच्या ताब्यांत सर्व जीव गेल्यामुळे भुलून गेले. हे दोघे एक विचाराने वागू लागल्यामुळे आम्हाला राग आला म्हणून बुधाजी पाटलाचे मुलास म्हणजे बुद्धिच्या वासनेस आवरून धरण्यास सांगितले. मी सद्गुरू निवृत्तिरायांचा सेवक असून माझा नमस्कार त्या निवृत्तिरायांनाच असो. त्यांच्याच कृपेने माझा संसार सफळ झाला.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.