ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.992
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके जोहार अभंग ९९२
कासवीचे तूप जेवी । आकाश घालीपां पेवीं । वांझेचे बाळ खेळवी । रूदना करी रया ॥१॥ पाहे या नवल चोज । म्यां देखिलें पां मज । गुह्यांचें गुज । जाण रे मना ॥२॥ मृगजळें सागर भला । डोंगरे ओणवा विझविला । समुद्र तान्हेला । जीवनालागीं ॥३॥ ज्ञानदेव ऐसें म्हणें । कापुराची मैस घेणें । दुधावीण सांजवणें । भरलें दिसे ॥४॥
अर्थ:-
कासवीला वास्तविक दूध नसून तिची कृपादृष्टि नी आपल्या पिलांना पोसते. तद्वत् श्रीगुरूमाऊलीला दूध नसून तिचे कृपादृष्टीरुपी दूधानें परमात्मरूपी तूपाचे जेवण ती साधकाला घालते. या न्यायाने ज्याप्रमाणे कासवीचे म्हणजे सद्गुरूरुषी माऊलीचे कृपादृष्टिने परमात्मरूपी तूप त्याचे जेवण करवून पेव जसे खोल असते. त्याप्रमाणे कळण्यास अत्यंत खोल असलेला परमात्मा त्याचे ठिकाणी आकाशादि सर्व बाधीत करून अजातवादांत माया व तत्कार्य प्रपंच असणे शक्य नाही. तरीपण विवर्तवादांचे दृष्टिने तिने जगत केले म्हणजे वांझेचा बाळ असलेला प्रमाता तो परमात्मसुखाविषयी रूदन करीत असतांना त्या सद्गुरू माऊलीने परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी खेळविलेे. हे कसे आश्चर्य आहे पहा मी आपले स्वरूपाला पाहून गुह्यांचे जे गुह्य परमात्मा त्याला मनाने जाणले त्यामुळे मृगजळाप्रमाणे क्षणिक असलेल्या विषयसुखाविषयी विषयाचा बाध करून सुखाचा समुद्र केला. त्यामुळे डोंगराप्रमाणे अफाट असलेल्या परमात्मज्ञानाने जीवाला जो प्रपंचाचा वणवा लागला होता. तो विजवून टांकून जो परमात्मा त्याची त्याला तहान लागली होती. त्याला परमात्मरूपी जीवनाचा समुद्रच केला. शुद्ध कापुराचे ठिकाणी काजळी घेणे. किंवा दूधावांचून रांजण दूधाने भरणे शक्य नाही. तद्वत् शुद्ध परमात्मरूपी कापुराचे ठिकाणी जीवदशारूपी काजळी धरणे किंवा जीव मूळचा परमात्मस्वरूप असतांना परमात्मरूप होणे शक्य नाही. तो तात्त्विक दृष्टिने जीव नसुन मूळचाच परमात्मरूप आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.