ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.987
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९८७
माते आधि कन्या जन्म पावली तिच्या वऱ्हाडा आईति केली । पाहों गेलों तये चरण ना नेत्र संपूर्ण लक्षणे वोळखिलीं । नवरा गर्भवासी पहिले नामरसी घटित आहे दोघांसी । याचा अर्थ तुम्ही करा श्रोते हो लग्नेंविण आणिली घरासी रेरे ॥१॥ कवण कवणाचा विचारू करा उपजत पुत्र म्हातारा । युगे गेली तया जहालिया जन्म ऐसें एक अवधारा ॥२॥ पुत्रें मातेसी पय पाजिलें कीं पितयासी कडे वाहिलें । तुम्ही म्हणाल शास्त्रे काय देखिलें तरी उजुचि आहे बोलिलें । साही शास्त्रे अठरा पुराणे यामध्ये नाहीं बोलिलें । शास्त्र गूढ अध्यात्म गूढ वज्र गुढी पाहे म्हणितलें रे रे ॥३॥ साही शास्त्रे शिणलीं भारी परी अर्थ नकळे कवण्यापरी । सुजाण श्रोते कविजन अपार कवित्व करिती लक्षवरी । एक एक अक्षराची जाणिव पाहताती सुजाण श्रोते । कवित्वा कवित्वीं हे काय नवल ज्ञानदेवीं पाहिलें निरूतें रे रे ॥४॥
अर्थ:-
शास्त्रीय दृष्टीने विचार केला असता माते आधि कन्या जन्म पावली या म्हणण्यांत कारणाच्या पूर्वी कार्याची सिद्धी असते. असे म्हणण्यासारखे झाले. परंतु तात्त्विक विचार केला तर कारण अगोदर असते व नंतर कार्य होत असते. या सिद्धांताच्या विरुद्ध माऊलीचे कथन आहे. परंतु विचार केला तर माऊलीचे म्हणणे कसे योग्य आहे. याचा विचार करणे अवश्य आहे तो असा की, माते आधि, म्हणजे विदेहमुक्तिच्या अगोदर कन्या जन्म पावली म्हणजे जीवन्मुक्ति प्राप्त झाली. तिच्या वऱ्हाडा म्हणजे तिच्या लग्नाला म्हणजे जीवन्मुक्तिला ती विदेहमुक्ति कारण झाली. तिला पाहू गेले तर तिला हात पाय कान डोळे नाही हे मी पूर्णपणे ओळखले. तिचे लग्न लागण्यापूर्वीच म्हणजे जीवन्मुक्ति होण्याच्या पूर्वीच हिचा परमात्मरूपी नवरा तिच्या गर्भात होताच. म्हणून या दोघींची म्हणजे विदेहमुक्ती व जीवन्मुक्तिची नावरास चांगली जमली. हे दोघे लग्नांवाचून परमात्मरुपी घरांस आणिले. कोणी कोणाचा विचार करावा कारण जीवन्मुक्तित उपजत पुत्र म्हणजे प्रकाशीत झालेला परमात्मा उपजल्यापासून म्हणजे प्रकाशीत झाल्यापासून कहीक युगांचा म्हातारा म्हणजे अनादि अनंत अशा मुलाचा तिच्या ठिकाणी जन्म झाला.त्या मुलाने जीवन्मुक्ति मातेला दूध पाजविले म्हणजे जीवन्मुक्तिच्या विलक्षण सुखाचा भोग दिला. तिने बापाला म्हणजे परमात्म्याला पोरं कडेवर वागविले म्हणजे सांभाळिले. तुम्ही म्हणाल हे कोडे आम्हास तर कांही समजत नाही म्हणून शास्त्रे काय सांगतात.हे पाहू गेलो तेंव्हा त्यांनी असे काही वर्णन केले नाही. असे म्हणू नका. त्यांनी तें यथार्थ प्रतिपादन केले आहे. ती सहा शास्त्रे अठरा पुराणे आम्ही म्हणतो तसे स्पष्ट सांगितले नाही तरी अध्यात्मशास्त्र वज्राप्रमाणे फार गूढ आहे.आम्ही वर सांगितलेल्या कोड्याचा अर्थ समजण्याकरता शास्त्रांना फार कष्ट झाले. परंतु त्यांना कोणत्याही रितीने याचा अर्थ समजला नाही. सूज्ञ श्रोते मोठमोठे कवि आपआपल्या बुद्धिमत्तेने अपार कवित्व म्हणजे लक्षावधी कविता करतात.पण त्यांना याचा अर्थ कळत नाही परंतु सूज्ञ विचारवान श्रोते यातील एक एक अक्षराचा विचारपूर्वक अर्थ जाणतात. कवित्वालाही हे कवित्व आहे.यांत आश्चर्य काय? या सर्वांचा यथायोग्य अर्थ पाहुन माऊली ज्ञानदेवांनी सांगितले.