ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.760
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-९ वे, श्रीविठ्ठलप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७६०
जें ब्रह्मीं पाहतां मन न सिरे कोठें । ऐसियाचे पेठे मज उभें केलें ॥१॥ नावाडा श्रीरंगु जाहला हळुवारू । तेणें पावविला पारू ब्रह्मविद्येचा ॥२॥ श्रीगुरूवीण सर्व शून्य हेंचि मी जाणें । तेथिचिये खुणें निवृत्तिराजु ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलीं अनुसंधान । रात्रिदिन लीन ब्रह्मस्थिति ॥४॥
अर्थ:-
ज्या परब्रह्माच्या स्वरूपाविषयी विचार केला तर मन अन्यत्र कोठेही जात नाही.अशा परमात्म स्वरूपाच्या पेठेत मला नेऊन उभे केले. त्या पेठेत जाण्याला संसार समुद्र फार मोठा आहे. खरा तथापि भगवान जो श्रीरंग हा नावाडी होऊन त्याने मला हलकेच यत्किंचितही धक्का लागु न देता ब्रह्मविद्येचा पार प्राप्त करून दिला. हे सर्व उपकार श्रीगुरूचे असल्यामुळे त्या श्रीगुरूवांचून मी सर्व शून्य समजतो. कारण तेथील खूण प्राप्त करून देणारे श्रीगुरूनिवृत्तिराजच आहेत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या ठिकाणी अनुसंधान ठेऊन रात्रंदिवस ब्रह्मस्थितिमध्ये लीन करून ठेवणाऱ्या श्रीगुरूंचे काय उपकार सांगावे. असे माऊली सांगतात.