ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.735
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७३५
देखिले तुमचे चरण निवांत राहिलें मन । कासया त्यजीन प्राण आपुला गे माये ॥१ ॥असेन धणीवरी आपुले माहेरीं । मग तो श्रीहरि गीतीं गाईन गे माये ॥२॥ सकळही गोत माझें पंढरिसी जाण । बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥३॥
अर्थ:-
जिला भगवद्दर्शनाची उत्कंठा लागलेली आहे. अशी गोपिका आपल्या मैत्रीणीला म्हणाली हे सखे, जर भगवद्दर्शन झाले नाही तर मला आपला जीव ठेवावयाचा नाही. अशा स्थितित तिला भगवंत चरणाचे दर्शन झाले तेंव्हा ती देवास म्हणते. हे श्रीकृष्णा ! तुमच्या चरणाचे दर्शन मला आज झाले. त्यामुळे माझे मन फार स्वस्थ झाले. जोपर्यंत तुमच्या चरणाचे दर्शन होत नव्हते. तोपर्यंत मी आपुला प्राण त्यागाचा विचार करीत होते. परंतु आता मी आपला प्राण काय म्हणून टाकणार. आतां मी स्वस्थ आनंदाने आपल्या माहेरी म्हणजे परमात्मा श्रीविठ्ठल याच्या स्वरूपी राहून त्या श्रीहरिच्या गुणाचे गीत गायन करीन. आता माझे सर्व गोत पंढरपुरवासी विठोबाराय एवढाच आहे असे समजा. या माझ्या बोलण्याला प्रमाण म्हणून विचाराल तर माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांची शपथ वाहून मी सांगत आहे असे माऊली सांगतात.