ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.667
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६७
पाहतां वटाचा विस्तारु कैसा । शाखा फुटलिया कळिया तैसा ॥१॥ सांगाल पैं तें काय जालें ? । वटविस्तार दोही हरपले ॥२॥ विशुद्धचक्रीं मेरु हा नेडे । तेथें परदीपी साहित्य जोडे ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला । मनोमानसीं तया सामावला ॥४॥
अर्थ:-
वडाच्या झाडाचा विस्तार पाहूं गेले तर त्याच्या शाखा, फांद्या, डाहाळ्या कळ्या वगैरे मोठ्या असतात. परंतु एवढा विस्तार अत्यंत सूक्ष्मबीजाचा होता. तेव्हां हा विस्तार काय झाला ते सांगा पाहू. विचार करु गेलें असता. वड आणि त्याचा विस्तार हे दोन्ही बीजांत नाहीसे होऊन जातात.त्याप्रमाणे अत्यंत शद्ध जो परमात्मा त्याचे ठिकाणी ‘हा मेरु’ म्हणजे संसार ‘नडे’ म्हणजे गुप्त रुपाने राहतो. त्याचा पुन्हा विस्तार होण्याला परमात्मस्वरुपाच्या प्रकाशाची सहाय्यता होते. हा सर्व संसार माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे मनांत सामावून गेला आहे, असे माऊली सांगतात.