ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.621
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२१
ठकपरी धरिला मनोवेगें बांधला । तो ठेंगणाचि जाहला अनिवाड वो माय ॥१॥ समाधी ध्यान निजध्यासी आरुढळें । तंव अवघेचि पारूषलें अभावा वो माय ॥२॥ हा असो जैसा तैसा हृदयमंदिरीं ऐसा । परपुरूषीं अपैसा अनुसरलें वो माय ॥३॥ बरवा देखोनि न्याहाळी दिव्य कांती झळाळी । परब्रह्नी दिवाळी चहूंदिशांची वो माय ॥४॥ त्याने निवाला मनु भेंटला आपला जगजीवनु । तो आनंदगहनु उचंबळे वो माय ॥५॥ हा निरालंब वोळला भक्तिभावें मिळाला । रखुमादेवि दादुला विठ्ठलु राणा वो माय ॥६॥
अर्थ:-
हा परमात्मा मोठा ठक आहे. कारण तो सहज रितीने मन, बुद्धि, इंद्रिये या कोणासच सांपडत नाही. असा जरी तो असला तरी मी त्याला शुद्ध मनाने बांधून टाकला आहे. हो तो जरी अपरंपार असला तरी तो कोंडून धरला तर मनांतही राहाण्यासारखा लहान होतो. परमात्मस्वरूप प्राप्तीच्या ध्यासाने, समाधी ध्यानाचे मार्गास लागलो. तो त्या सर्व साधनांचा अभाव होऊन गेला. परमात्म्याला शब्दाने असा तसा सांगता येत नसल्यामुळे आता अनुभवाने असे म्हणण्याचे पाळी येते की हा परमपुरूष हृदयांत ज्या रूपाने गुरूकृपेने प्रगट झाला आहे. त्यालाच मी सर्व भावाने अनुसरले. त्या श्रीकृष्णाची सुंदर प्रकाशित असलेली दिव्य कांति, ती चारी दिशांना आनंदाची दिवाळीच म्हणून समजावी. तो जगजीवन परमात्मा मला भेटून गहन, आनंद, मनांत उचबळून आल्यामुळे मन शांत झाले. हा मला प्राप्त झाला म्हणाल तर तो केवळ भक्तिभावानेच प्राप्त झाला असा दादला म्हणजे विश्वाधिपति कोण म्हणून विचाराल तर हा रखुमादेवीचा पती जो श्रीविठ्ठल राजा तोच होय. असे माऊली सांगतात.