ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.619
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६१९
ठसावलीं देहीं परब्रह्ममूर्ति । सोहं शब्दी गती प्राप्त जाली वो माय ॥१॥ सहजीं सहज स्थिति झाली वो माय ॥ध्रु. ॥ विराली अष्टांगें देखोनी गोमटें । पाहतां प्रेम फुटे पाती श्रमती वो माय ॥२॥ अष्टभुजांचिया रिघालिये खेवा । तंव विश्वाचा बाहुवा देखिला वो माय ॥३॥ नसमाय लेववितां लेइजे कैसेनि । निरंजन अंजनी लेइले वो माय ॥४॥ हे भुली सांडूनि भुलवी परमबोध बोधवी । तो हा रखुमादेविवरू विठ्ठलु वो माय ॥५॥
अर्थ:-
परब्रह्ममूर्ति म्हणजे निराकार सच्चिदानंद ब्रह्म आणि साकार श्रीकृष्ण मूर्ति अंतःकरणांत ठसावली. सोहं शब्दाने जी स्थिती प्राप्त व्हावयाची ती झाली.त्या सहज स्वरूपस्थितिला, त्या श्रीकृष्णमूर्ति पाहिल्याबरोबरच प्राप्त झाले. ते शामसुंदर स्वरूप पाहून अष्टांगयोगाची खटपट विसरून गेली, कृष्णमूर्तिला पाहिल्याबरोबर अंतःकरणात प्रेमाचे पाझर फुटून डोळ्यातुन प्रेमाचे अश्रु वाहु लागले. त्या अष्टभुंजाच्या चतुर्भुज मूर्तिला आलिंगन द्यावयास गेले.तो चार भुजा कसल्या घेऊन बसलात’ तर तो विश्वबाहू असलेला मी पाहीला. त्याला डोळ्यांत भरून घ्यावा म्हंटले तर तो डोळ्यांत मावणार कसा? म्हणून निर्विकार परमात्मस्वरूपाचे अंजन डोळ्यात घातले. तो श्रीकृष्ण आलिंगनादि व्यवहाराची भूल नाहीसी करून स्वकिय सच्चिदानंद स्वरूपाचा बोध करून देतो. असा तो ऱखुमादेवीचा पती श्रीविठ्ठल आहे असे माऊली सांगतात.