ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.326
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-९ वे, करुणा अभंग ३२६
मी माझे करूनि देह चालविसी वायां आतां । जेथींचा तेथे निमोनि जाय ऐसे कीजे देवराया ॥ जंव जंव गोड तंव तंव जाड । जाड गोड दोन्ही नको रया ॥ त्रिगुण वोझे जडपण रचनि लोटुनि देसी महापुरी । आवर्त वोळसा पडिलिया । मग तेथे कैची असे उरी रया ॥ ऐसे लटिकेचि गाऱ्हाणें देवों मी किती । तंव तुज नये काकुलती । बापरखुमादेविवरा विठ्ठला म्यां तुजमाजी घेतली सुती रया ॥
अर्थ:-
देहाच्या ठिकाणी मी आणि देहसंबंधी पुत्रमित्रांच्या ठिकाणी माझे असा व्यवहार वाढवून देह व्यर्थ चालवितोस. त्यापेक्षा मूळ स्वरूपापासून देहादिकांची उत्पत्ति झाली.त्याच ठिकाणी आपले ऐक्य करून द्यावे. जो जो हे विषय सुख तुला गोड वाटते तों तों ते परिणामी जड दुःखप्रद असते. म्हणून त्या वैषयिक सुखदुःखाच्या नादी लागू नकोस. त्रिगुणाचे म्हणजे सत्त्व, रज, तमाचे हे शरीर रचून ते दुःखप्रद शरीर जीवाच्या गळ्यांत अटकवून संसाराच्या मोहपूरांत लोटून देतोस त्यामुळे त्या संसार समुद्राच्या भोवऱ्यात एकदा जीव पडला की मग त्याला तेथून सुटका कशी होणार.परमात्मव्यतरिक्त हा संसार लटका आहे. तोपर्यंत तुला जीवाविषयी दया उत्पन्न होत नाही. तो पर्यंत मी तुला त्या संसाराचे गाऱ्हाणे किती वर्णन करावे. पण गाऱ्हाणे वर्णन करण्याशिवाय दुसरा उपायच काय, रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल ह्यांच्यांशी ऐक्य होण्याकरिता मला तुझा छंद लागला आहे. असे माऊली सांगतात.