ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.232
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २३२
जंववरी, तंववरी जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिले नाही बाप ॥ जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही बाप ॥ जंववरी तंववरी मैत्रत्व संवाद । जंववरी अर्थेसी संबध पडिला नाही बाप ॥ जंववरी तंववरी युद्धाची मात । जंव परमाईचा पूत देखिला नाही बाप ॥ जंववरी तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप ॥ जंववरी तंववरी बाधी हा संसार । जंव रखुमादेविवरु देखिला नाही बाप ॥
अर्थ:-
सिंह दृष्टीस पडला नाही तो पर्यंतच कोल्ह्याची गर्जना. सुंदर स्त्री पाहिली नाही. तोपर्यत वैराग्याच्या गप्पा. पैशाचा संबंध आला नाही तो पर्यंतच मैत्रीचा बडेजाव. शत्रू समोर येत नाही, तोपर्यंतच युद्धाच्या गप्पा. अगस्ती ऋषीचे दर्शन होईपर्यंतच समुद्राच्या गर्जना.त्याचप्रमाणे जोपर्यंत रखुमादेवीचा पति जो श्री विठ्ठल त्याचे दर्शन झाले नाही. तोपर्यंतच या संसारातील सुखदुःखाची बाधा असे माऊली सांगतात.