ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 575
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५७५
परेसी जंव पाहें तंव दिसे हे अरूतें । तळी तळाखालतें विश्वरूप ॥१॥ दिव्य चक्षुदृष्टी निवृत्तीने दिधली । अवधीच बुझाली विष्णुमाया ॥२॥ शम दम कळा दांत उदांत । शांतितत्त्व मावळत उपरमेसी ॥३॥ गगनीं दिनमणी गगनासगट । अवघेची वैकुंठ तया घरीं ॥४॥ उद्धट कारण केलें हो ऐसें । तुष्टोनी सौरसें केलें तुम्हीं ॥५॥ ज्ञानदेव शरण निवृत्तीच्या चरणां । कासवीचा पान्हा पाजियेला ॥६॥
अर्थ:-
परा म्हणजे ज्ञानरूप वाणी तिच्या सहायाने विश्वाचा विचार करू गेले तर हे विश्वरूप निकृष्ट दिसते. कारण तळी म्हणजे परमात्मस्वरूपावरील माया तिच्यावर हे विश्वरूप दिसते. परम भाग्याने श्रीगुरू निवृत्तीरायांनी मला दिव्य दृष्टी दिली म्हणून ही परमात्मस्वरूपांवर असलेली माया सर्व नष्ट होऊन गेली. त्याबरोबरच शमदमादि कला आणि उदात्त अनुदातादिकांनी युक्त जो वेद ते शांतीतत्त्व म्हणजे परमात्मतत्त्वांत उपरमासह मावळले आकाशासह सूर्य मावळून माझ्या घरी तुम्ही सर्व वैकुंठच केले. हे श्रीगुरू निवत्तीराया आपण माझ्यावर संतुष्ट होऊन केवढे मोठ हे महत् कार्य केले. त्याचे वर्णनच करता येत नाही. कासवीच्या कृपादृष्टीप्रमाणे प्रेमपान्हा पाजणारे जे श्रीगुरूनिवृत्तिराय त्याच्या चरणाच्या ठिकाणी मी अनन्य भावाने शरण आलो आहे. असे माऊली सांगतात.