दृष्टांत 108 इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी
इंद्रियांवर ताबा*
एक महात्मा रस्त्यातून घरी चालले होते. वाटेत त्यांना एक लिंबू विक्रेता दिसला. लिंबे रसाळ आणि ताजी होती. महात्म्याच्या तोंडाला पाणी सुटले. लिंबे खरेदी केली पाहिजेत असे त्यांना वाटले. त्यांनी लिंबाना निरखून पाहिले, ती स्वादिष्ट आहेत काय याचीही चौकशी केली पण जिभेच्या या चोचल्याचा मनाने धिक्कार केला.
लिंबू पाहून तोंडाला पाणी सुटणे हा एक प्रकारचा लोभ आहे आणि तो साधनेच्या कार्यात अडथळा निर्माण करतो. महात्मा पुढे गेले परंतु त्यांचा जिभेचा शौक हार मानत नव्हता. त्यांची जीभ लिंबांचा स्वाद घेण्यासाठी आसुसली होती. ते परत लिंबूवाल्याकडे आले. त्याच्याकडील लिंबे निरखून पाहू लागले. परत एकदा मनाने धिक्कार केला आणि हातातील लिंबू खाली टाकून महात्मा परतले. चार पावले पुढे गेल्यावर परत एकदा त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ते परत लिंबूवाल्याकडे आले. लिंबूवाला त्यांचे हेलपाटे पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला हे कळेना की हे महात्मा सारखे का हेलपाटे मारत आहेत. यांना खरेच लिंबू खरेदी करायचे आहे की नुसतेच पाहत आहेत. शेवटी न राहवून त्याने विचारले,”महाराज, तुम्हाला जर लिंबे खरेदी करायची असतील तर अवश्य करा ना पण नुसतेच हेलपाटे का मारत आहात.” शेवटी महात्म्यांनी दोन लिंबे खरेदी केली आणि घरी आले. घरी येताच त्यांनी पत्नीला चाकू मागितला. लिंबांचे दोन तुकडे केले. जसा पहिला लिंबाचा तुकडा तोंडाजवळ आणला तसा मनाने टोमणा मारला,”वा रे वा महात्माजी,
तू तर या जिभेचा गुलाम झाला. जीभ जशी नाचवेल तसा तू नाचायला लागला. ती जे खायला मागेल तसा तू तिला खायला द्यायला लागला. आता तुझी साधना ही विषयांकडे चालली आहे.” तितक्यात त्यांची पत्नी तिथे आली व तिने पतीचा तोंडाजवळ थबकलेला हात पाहून विचारले,”अहो, लिंबाचा स्वाद घेता घेता का थांबलात.” महात्म्यांनी ते कापलेले लिंबू आणि उरलेले अर्धे लिंबू दोन्हीही पत्नीच्या हातात देऊन तिला सांगितले,” मी आता हे खाणार नाही कारण आता मी जीभेवर विजय मिळवला आहे. आता मला विश्वास पटला आहे की मी इंद्रियावर ताबा ठेवू शकतो.”
तात्पर्य– इंद्रियांवर ताबा ठेवता येणे ही फार मोठी साधना आहे.