दृष्टांत 52 कलियुगातही चांगुलपणाचा विश्वास शिल्लकच
आयुष्याच्या प्रवासात कोण, कुठे, केंव्हा आणि कशा स्वरूपात मिळेल काहीच सांगता येत नाही. अशाच एका प्रवासात मला आलेला
अनुभव थोडक्यात असा.
माझ्या जिवलग मित्राच्या मुलीचं लग्न होतं राजमुंद्री या गावाला. विशाखापट्टणम पासुन काही मैलांवर असणारं हे गाव.
मी विशाखापट्टणम स्टेशनवर मिसेससह पोहोचलो. रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली होती. पाय ठेवायला जागा नव्हती. काही प्रवासी ऊभ्यानेच प्रवास करीत होते.
एकदाची ट्रेन सुरू झाली आणि हायसे वाटले. राजमुंद्रीला जातांना तूली नावाचं एक स्टेशन लागतं. गाडी हार्डली एखादा मिनिट थांबत असेल.
खिडकीतूनच चहा व्हेंडरला हाक मारून दोन काॅफींची ऑर्डर दिली आणि ईथेच सर्व गडबड झाली. मी ensure करायला हवं होतं की माझ्या वाॅलेटमधे चिल्लर पैसे आहेत की नाहीत. एक दोनशेची नोट होती त्याला दिली. ऊरलेले पैसे वापस घेता घेता ट्रेन सुरु पण झाली.
झालं, तिकडे रेल्वेचं इंजीन भडकलं आणि ईकडे बायको. थांबता थांबेना. “आधीच सांगितलं होतं तुम्हाला, काॅफी घेऊ नका म्हणून, आणि वेंधळे तर ईतके की पैसे आधीच देऊन टाकले.”
गाडी सुरु झाली. गाडीने वेग घेतला. तो बिचारा व्हेंडर ईच्छा
असुनही पैसे वापस करु शकला नाही. त्याची असहाय्यता मी खिडकीतून पाहात होतो.
हिची तडफड सुरूच. “गेले ते दोनशे रुपये.” सहप्रवासी
आमचा संवाद एन्जॉय करीत होते.
“अगं तो गरीब माणूस आहे. अशी नसतात ही माणसं. त्यांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे.”
“मग द्या काढून त्यांना जेवढे असतील नसतील तेवढे. लक्षात आलं ऊन्हाळा सुरु झाला आहे. ग्रीष्माचे वारे सहन करावेच लागतील. मला माहिती आहे त्याने हे जाणून बुजून केले असणार. दिवसातून असे दोन चार कस्टमर मिळालेत की झाले त्यांचे काम.”
आता माझ्याच्यानेही राहावेना. बायकोला म्हणालो, “ए बाई, जरा ऐकतेस का. काय होणार आहे त्याचे आपल्या या दोनशे रूपयांनी. असली हरामाची कमाई त्यांनाही नकोच असते. आपल्यापेक्षा सुसंस्कारित असतात हे लोक. ऊगांच त्यांना दोष देऊ नकोस. माणसांच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे.”
चांगुलपणाच्या माझ्या थिअरीवर बायकोचा विश्वास बसणं शक्यच नव्हतं. सहप्रवासी आमच्या संभाषणाची मजा घेत होते. जो तो आपापल्या मगदुराप्रमाणे अर्थ काढीत होता. काहींच्या मते मी बरोबर होतो तर काहींच्या मते चुकीचा. प्रत्येकातच चांगलं आणि वाईट दोन्ही असतचं असतं.
पाहता पाहता पिठापुरम स्टेशन आलं. प्रवाशांच्या विचारांची दिशा बदलली. ते त्यांच्या कामाला लागलेत आम्ही आमच्या.
तेव्हड्यात एक बारा तेरा वर्षाचा मुलगा माझ्यापुढे येऊन ऊभा राहिला. नीटनेटके स्वच्छ कपडे आणि बोलण्यात आत्मविश्वास. म्हणाला, “साहेब, तुली स्टेशनवर आपण काॅफी प्यायलात का, आणि व्हेंडरला दोनशे रूपये दीलेत ना?.
“हो, पण तू तो नाहीस ज्याच्याकडून आम्ही काॅफी मागवली.”
“हो, साहेब बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. ते माझे वडील आहेत. फोनवरून त्यांनीच मला कळवलं की तुमचे ऊरलेले 180/- रुपये वापस करायचे आहेत, आणि तेच वापस करायला मी आलो आहे. तुमचा बोगी नंबर, सीट नंबर त्यांनी मला फोन करून कळवला आहे साहेब.”
आता चाट पडायची वेळ बायकोवर आली. विश्वासच
बसू शकत नव्हता की असं काही घडू शकतं ते. त्याला विचारलं घरी कोण कोण असतं ते.
“मी, माझे वडील आणि मोठा भाऊ. मी दहावीला आहे. मोठा भाऊ बाबांना मदत करतो दुपारच्या वेळी, आणि मी सकाळी मदत करतो.”
“तू असं कर, बाबांचा नंबर दे मला. मी जरा बोलतो त्यांच्याशी.”