ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.990
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके कुट अभंग ९९० .
कैसें बोटाने दाखवूं तुला । पाहें अनुभव गुरूच्या मुला । नको सोडूं देठींच्या मुळा । सोडी अंजुळी आपुल्या कुला रे ॥१॥ ज्या ठायीं चळना ढळ । विश्व जयाचे सत्तेनें खेळ । अणुरेणु व्यापक सकळ । तेथें चळ ना अचळ रे ॥२॥ जेथे डोळिया दृष्टि पुरेना । तेथें वृत्तीचे काही चालेना । तेथें बुद्धीचा रीघ होईना । तेथें मनाची धांव पुरेना गा ॥३॥ काय पाहशीं तूं भोवतें । येतां जातां जवळी असतें । तुझ्या पायाखाली तुडवतें । तुझ्या डोळ्यामध्ये दिसतें गा ॥४॥ ही खुण त्वां ओळखुनी घ्यावी । गुरूपुत्रा जाउनी पुसावी । तो नेऊनी तुला दाखवी । सोय सांगितली ज्ञानदेवीं गा ॥५॥
अर्थ:-
तुला परमात्मा बोटांने कसा दाखवावा तो अनुभवानेच कळणारा आहे. तुझे जे मूळचे स्वरूप त्याचे विस्मरण होऊ देऊ नकोस आणि देहात्मबुद्धिने मानलेले कुल नाम रूपादिक त्याना तिलांजली देऊन टाक. या परमात्म्याला चळ ना ढळ म्हणजे क्रियारहित सर्व विश्व त्याच्या सत्तेने खेळते हे अणूरेणू पेक्षाही सूक्ष्म व व्यापक असून ते अक्रिय आहे. जे पाहतांना डोळ्याची दृष्टि पोहचत नाही. मनोवृत्तीचे काही चालत नाही, बुद्धिचा तेथे प्रवेश होत नाही. मनाची धांव तेथे पुरत नाही. तूं आतां भोवती काय पाहतोस येता जाता तें तुझ्या जवळच असते. तुझ्या पायाखाली तुडवले जाते. तुझ्या डोळ्यामध्येही तेच आहे. हे वर्म श्रीगुरूंना शरण जाऊन वोळखून घे. तो श्रीगुरू तुला यथार्थ बोध करून देईल.असा हा मार्ग मी तुला दाखवून दिला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.