ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.733
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७३३
पंचविसा वेगळे महत्तत्त्व बोलिजे । तें मज अंगवि ऐसें निवृत्ती केलें वो माये ॥१॥ सहज बोधे बोधलें न विचार आपुलें । म्हणोनियां मुकलें अवध्यांसी वो माय ॥२॥ पाचांहुनी परती मी जाहालिये निवृत्ति । चिदानंदी सरती स्वरूपीं वो माये ॥३॥ ऐसें जाहलें चांग अचिर देवांग । रखुमादेविवरें पांग फेडिला वो माये ॥४॥
अर्थ:-
सांख्य शास्त्रामध्ये चोवीस तत्त्वे मानतात त्या चोवीस तत्त्वाहून जो पंचविसावा पुरूष म्हणजे वेदांतमतांत आत्मा हेच मुख्य तत्त्व आहे. ते मला श्रीगुरूनिवृत्तिरायांनी अंतःकरणांत जाणून दिले.आणि ते परमतत्त्व सहज व अखंड बोधरूप आहे. असा बोध मला सहज झाला. म्हणून माझ्याहून भिन्न आपले असे म्हणण्यास अवकाशच नसल्यामुळे मी सर्वास मुकलो. मी पंचमहाभूताच्या कार्यापासून निवृत्त होऊन सच्चिदानंदरूपी एकरूप होऊन गेलो. श्रीगुरूनी कृपा केल्यावर व माझी पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी कृृपा केल्यावर अचिर म्हणजे ताबडतोब मी देहभाव, परमात्मरूप होऊन गेलो. अशा रितीने माझ्या अनेक जन्माचा पांग फिटला. असे माऊली सांगतात.