ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.703
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-५ वे, गुरुवर्णन अभंग ७०३
गुरूज्ञान नाहीं ज्यासी । तरुणोपाय नाहीं त्याशी । तो नावडे ऋषीकेशी । व्यर्थ जन्मासी तो आला ॥१॥ देव धर्म नेणे कांहीं । धरी प्रपंचाची सोई । त्या कोठेही थार नाहीं । हे वेद बोलिलासे ॥२॥ कृष्णकथा जो नायके । रामनाम न म्हणें मुखें । तया सोसकोटी दुःखें । जन्म योनी भोगू लागेल ॥३॥ ज्ञानदेवी अभ्यास केला । सर्व संसार हा तारिला । रामकृष्णे भवपाश तोडिला । सर्व पितरांसहित ॥४॥
अर्थ:-
ज्या पुरूषाला गुरूंचा अधिकार कळत नाही. त्याला संसार समुद्रातून तरून जाता येणार नाही. इतकेच काय पण तो देवाला देखील आवडत नाही. त्याचा जन्म निष्फळ आहे. ज्याला देवधर्म आवडत नाहीत व प्रपंचाची कास धरून चालला आहे. त्याला ऐहिक अगर पारलौकिक कुठेही सुख मिळणार नाही.हे वेदानीच सांगितले आहे. जो कृष्णकथा ऐकत नाही मुखाने राम राम म्हणत नाही त्या पुरूषाला कोट्यवधी जन्म घेऊन नरकयोनीत दुःख भोगावे लागतील. मी श्रीगुरूचे सहाय्य घेऊन अनेक जन्मामध्ये भगवन्नामस्मरणादि अभ्यास केला म्हणून हा संसारसमुद्र तरून गेलो. मी स्वतःच तरून गेलो असे नाही तर माझ्या सर्व पूर्वजांचा संसार पाश तोडून मी त्यांना मुक्त केले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.