ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.693
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६९३
समर्थ सोयरा बोळावा केला । परी मार्गु गमला सुखाचा बाईये ॥१॥ भय आमुचें गेलें न व्हावें तें जालें । तो चोरूचि वोळखी जाली बाईये ॥२॥ लक्षाचा लाभु जोडला ठावो । रखुमादेविवरू विठ्ठल नाहो ॥३॥
अर्थ:-
‘समर्थ’जो भगवान श्रीकृष्ण त्याला आम्ही नातेवाईक करून आमच्या मागच्या जन्ममरणाचे भय नाहीसे होऊन गेले. हे लोकदृष्ट्या जरी वाईट दिसले तरी त्यामुळे आमचा प्रपंच सुखाचा झाला आमचे भय तर गेलेच पण न होणारे ते झाले. म्हणजे परमात्मलाभ होणे अत्यंत दुर्लभ पण तो झाला. सर्व प्रापंचिक लोकांची दृष्टि चोरून त्यांचेमध्ये वास करणारा श्रीहरि त्याचीच आज ओळख झाली. तत्पद लक्ष्य जो परमात्मा त्याचा लाभ झाला व तो कोण आहे असे म्हणून विचारले तर रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच आमचे नाहो म्हणजे प्रियकर आहेत. असे माऊली सांगतात.