ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.602
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२
एकतत्त्व बाही उतरला भक्त । द्वैतदशा विरक्त पाहातां ठेली ॥१॥ द्वैताची काजळी क्रोधु दशा पाजळी । नाहीं ते उजळी तमदृष्टि ॥२॥ जंववरी कामना आसक्त मोहो । तंववरी ग्रहो कल्पनेचा ॥३॥ ज्ञानदेवीं चित्तीं आनंदमय हरि । द्वैताची कामारी नाईके कानीं ॥४॥
अर्थ:-
विरक्तभक्त ब्रह्मात्मैक्यज्ञानाने संसार सागर तरुन गेला. त्या स्थितीत द्वैत म्हणजे प्रपंच सत्यत्वाने नाहीसाच झाला. तें एकतत्त्व ज्ञान द्वैताची काजळी जो क्रोध व त्याचे मूळ कारण जे अज्ञान यांचा नाश करुन त्यांना बिंबरुपाचा म्हणजे आत्म्याचा उजाळा मिळतो. जो पावेतो जीव स्वरुप अज्ञानात गुंतलेला असतो. तोपर्यंत प्रपंचात कल्पनांची गर्दी असते. माझ्या चित्तांत आनंदरुप श्रीहरि असल्यामुळे द्वैतरुपी दासीची वार्ता देखील कानांवर येत नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.