ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 565
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५६५
काय करिसी सकळ देवांचे वैभव विलास । माझिया स्वामी वीणते अवघे उद्वस रया ॥१॥ तपन त्या कमळा कमळीविकासु । सुकवी मयंकु काय करिसी अरे बा सुधांशु ॥२॥ साताही वारांचे दिवसु एकियाचि सुरिजे । तैसे सर्वी सर्वपण माजिंये न श्रीराजे ॥३॥ सर्वज्ञ सुंदर देव होतु कां भलतैसे । परी जडातें चेष्टविते आणिकां पैं नसे ॥४॥ जया नांव नाही रूप चिन्ह कांहीं । नामरूप चिन्ह स्वयेंचि पाहीं ॥५॥ बापरखुमादेविवरू आहे तैसाचि पुरे । काय करिसी आणिकां देवांची गोवारें रया ॥
अर्थ:-
एका पंढरीरायाव्यतिरिक्त इतर इंद्रादिक देवांचे वैभव मोठे असले तरी त्याला घेऊन काय करावयाचे? माझा स्वामी जो पंढरीराय त्याच्यावाचून हे सगळे देव व्यर्थ आहेत. सूर्विकासिनी कमळाला तप्त करणारा सूर्योदय झाला तरच त्याचा विकास होतो. चंद्रोदय झाला तरी ती मिटतात. मग तो चंद्र अमृतांश जरी असला तरी त्याचा काय उपयोग. वारांचे दिवस सात असले तरी त्या सर्वांमध्ये सूर्य जसा एक तेजस्वी असतो. बाकीचे सोम, मंगळ, बुध,गुरू, शुक्र, शनि यांचे वार असूनही प्रकाशनामध्ये त्यांचा काही उपयोग नाही. आदित्यवाराच्या पुढे ते निस्तेज आहेत. त्याप्रमाणे सर्व पदार्थामध्ये सर्व पदार्थरूप होऊन असणारा पंढरीराय मुख्य आहे. बाकीच्या देवता त्याच्यापुढे तुच्छ आहेत. परमात्मव्यतिरिक्त बाकीचे देव कितीही सुंदर असोत किंवा सर्वज्ञ असोत पण जगाला चेष्टविण्याचे सामर्थ्य परमात्म्याव्यतिरिक्त दुसऱ्याजवळ नाही. परमात्म्याला तात्त्विक दृष्टीने नांव नाही, रुप चिन्ह काही नाही. परंतु नामरूप चिन्ह स्वरूपांत सर्वप्रकारे त्याचीच व्याप्ती आहे. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल, तो जसा आहे तसाच आम्हाला पूरे. बाकीच्या देवांची भरती आम्हाला काय करायची असे माऊली सांगतात.