ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.745
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४५
आपुलें कांहीं न विचारितां धन । निर्गुणासी ऋण देऊं गेलेंII१ ॥ थिथें होतें ते निध सांठविलें । विश्वासे घेतलें लक्षवित ॥२॥ ऐसा हा निवृत्तिप्रसादु फळासी आला । निर्फळ केला मज निर्गुणाकारे ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु साच म्हणोनि रिघालो । तेणें नेऊनि घातलो निरंजनी ॥४॥
अर्थ:-
माझी काय स्थिती होईल याचा कांही एक विचार न करता निर्गुण परमात्म्याशी ऋण देण्याचा व्यवहार करू गेले. त्यामुळे मज जवळ असलेले माझे धन म्हणजे परमात्मरूप माझ्या ठिकाणी साठवलें आणि विश्वासाने तत्पद लक्ष्य हेच धन मी घेतले. या रितीने हा श्रीगुरूनिवृत्तिरायांचा प्रसाद फलद्रूप झाला. आणि मी मानीत होतो तो सर्व संसार निष्फळ होऊन निर्गुण परमात्मरूप झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हेच खरे आहेच. म्हणून त्यांचे ठिकाणी त्यांचे प्राप्तीकरता म्हणून निघालो. तर त्यांनी मला निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन पोहोचते केले असे माऊली सांगतात.