ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.669
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६९
माझें स्वरुप म्यांचि शृंगारिलें । निर्वाणी म्यां केले लयाकार ॥१॥ आपुली सोय वाढवावया गेलें । तंव आपणचि जालें आपण्याठायीं ॥२॥ सहज गुणाचें निर्गुण वो केलें । माझें ग्यां पाहिलें मन मावळुनी ॥३॥ तीन चारी मिळोनी येके ठायीं घातली । बापरखुमादेविवरा विठ्ठलीं फावलीं ॥४॥
अर्थ:-
माझे स्वरुप मीच शृंगारले म्हणजे विचार करुन निर्वाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी लय केला.मी आपल्या स्वरुपाची वाढ करण्याकरिता परमात्म्याचा विचार करु गेले, तो परमात्मा दुसरीकडे कोठे नसून तो माझेच स्वरुप आहे. असे जाणून मी तद्रूप झाले. अविद्येमुळे जीव गुणयुक्त झाला आहे. विचार करुन पाहिले असतां जीवाचे सहज निर्गुण स्वरुप प्रतीतीला आले. आणि त्या स्वरुपांत मन हे मावळून गेले.त्रिगुणांने युक्त में अंतःकरणचतुष्टय तें एका आत्मस्वरुपाच्या ठिकाणीच घातले. तेव्हांच मला माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांची प्राप्ती झाली. असे माऊली सांगतात.