ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.622
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२२
पाहातां सप्त पाताळें एकविसांवेगळें । तें निरंजन आगळे खुतलें डोळां गे माय ॥१॥ पावां वाहे तलालोरी नादु उमटे अंबरीं । तया सुखसागरी बुडालें वो माय ॥२॥ सुखसंवाद लागला जीवनीं जीवनु भेटला । भेटी देऊनि गुंतला मनोमंदिरीं वो माय ॥३॥ आतां न सोडी न राहे आणिकु न पाहे । तंव हाचि लवलाहें मिळाला वो माय ॥४॥ आवडी रिघालें घर आपुलें । सहजी सामावलें स्वरुपी वो माय ॥५॥ वैराग्यभक्ती ज्ञानाची माऊली । ते रखुमादेविवर विठ्ठली भेटली वो माय ॥६॥
अर्थ:-
ह्या श्रीकृष्णाचे स्वरूप पाहू गेले तर हे सप्त पाताळ (अतल, वितल, सुतल, रसातल,तलातल, महातल, पाताळ) किंवा पंचज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार व स्थूल देह आणि स्थूल सूक्ष्म यांचा संघात या एकवीस तत्त्वाहि पलीककडे म्हणजे ह्या एकत्व समुदायाच्या पलीकडे असलेल्या श्रीकृष्णाचे स्वरूप निराळे असून ते माझ्या डोळ्यांत खुतले म्हणजे गच्च भरून गेले हो. त्याचे स्वरूप काय सांगावे.? खांद्यावर तलालोरी म्हणजे तालात वाजणारा पावा असून त्या पाव्याचा नांद आकाशांत दुमदुमून भरला आहे. अशा श्रीकृष्ण सुखाच्या समुद्रात मी बुडून गेले. त्याचे बरोबर मला आनंदाचा संवाद प्राप्त झाला. तो संवाद माझ्या जीवाचे जीवनच होऊन बसला आहे. त्यानी मला भेट देऊन माझ्या मनांत गुंतून बसला आहे.आतां ज्याला सोडून मन मुळीच राहणार नाही व ज्याचे वांचून दुसरे पाहणार नाही. तोंच माझ्या स्वरूपांशी ऐक्य होऊन गेला आहे. आवडीने मी त्याच्या घरांत गेले. तो सहजच माझ्या स्वरूपात येऊन साठवला. अशी भगवत्प्राप्ती होण्याचे मुख्य साधन काय म्हणून विचाराल तर वैराग्ययुक्त भक्ति हे ते साधन आहे. ज्ञानरूप माऊली असा जे रखुमादेवी चे पती श्रीविठ्ठल, त्यांची भेट मला झाली. असे माऊली सांगतात.