ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.497
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९७
सेवितां वारूणी देहभास लपे । बडबडची लपे शब्द नाना ॥१॥ ब्रह्मरस सुख जें कांहीं प्राशिती । तैसेची हे होती अनुभवें ॥२॥ धाल्याचे ढेकर निघती होतां सुख । तेवींची आत्मिक जाणिजेसु ॥३॥ सूक्ष्मी भासे जे कां तेंचि स्थूळी घडे । पाहतां निवाडे भेद नाहीं ॥४॥ गुरूकृपायोगें ज्ञानेश्वर चूळ । भरियेली समूळ न त्यागितां ॥५॥
अर्थ:-
दारु प्यायलेला देहभान विसरुन जाऊन त्यांची अर्थहिन बडबड थांबते. त्याप्रमाणे ब्रह्मरस प्यायलेले लोकही देहभान विसरुन त्यांच्या वृत्तित सहज मौन दिसते. जेवण झालेल्या मनुष्याला तृप्तीचा ढेकर येऊन जसा तो सुखी होतो. त्या प्रमाणे आत्मानुभवी पुरूष सुखी होतो. ब्रह्मस्वरूपाचा विचार केला तर जसे सुक्ष्मात सूक्ष्म असून, स्थूळातही स्थूळ आहे. स्थूळ सूक्ष्म हा उपाधीचा भेद ब्रह्मस्वरूपाचा नाही. मी गुरूकृपेच्या योगाने ब्रह्मरसाची चूळ न टाकता सर्व गिळली. असे निवृत्तीदास माऊली ज्ञानेश्वर सांगतात.