ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.451
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४५१.
तत्त्वे तत्त्व धरी कोहंभाव होकरी । सोहं सोहं करी कोण सये ॥१॥ सोकरी पुंडलिकु ज्ञान पुण्यश्लोकु । विठ्ठली त्रैलोक्य उद्धरिलें ॥२॥ सखी जाय तेथें भाव बळिवंत । प्रपंच देहांत नाहीं तुज ॥३॥ ज्ञानदेव पुसे निवृत्ति सौरसें । पुंडलिके कैसें पुण्य केलें ॥४॥
अर्थ:-
मी कोण आहे असे म्हणणारा आणि तात्त्विक विचाराने तो परमात्मा मी आहे असा विचार करणारा कोण ग?. फार दुर्मिळ, त्या परमात्म्याला स्वाधीन करून घेणारा ज्ञानवान पुण्यपुरूष असा एक पुंडलिकरायच आहे. त्याने त्या पंढरीरायाला स्वाधीन करून त्रैलोक्याचा उद्धार केला.हे सखे, तूं जर दृढ भक्तिभावाने त्या पंढरीरायाचे भजन करशील तर तुला हा दुःखरूप प्रपंच नाहीसा होऊन मी या देहाहून भिन्न असलेला परमात्मस्वरूपच आहे. असा तुझा निक्षय होईल. मी माझ्या श्रीगुरू निवृत्तारायांना विचारले की महाराज’ या पुंडलिकरायांनी असे कोणते पुण्य केले होते? तेव्हा निवृत्तीरायांनी मला असे सांगितले की त्या पुंडलिकरायांनी अनन्य भावभक्तीने पंढरीरायाची भक्ती केली होती. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.