भगवद्गीतेचे गीतेचे साठ अधिकरणे व विशेष माहिती
- Beginning
- गीता निर्मितीचा काळ
- गीतेच्या विविध आवृत्त्या व संबंधित ग्रंथ संपदा
- गीतेतील अध्याय
- गीतेची अठरा नावे
- अधिकरणें
- भगवद्गीतेवर आधारित अन्य मराठी/संस्कृत/हिंदी ग्रंथ
श्रीमद्भगवद्गीता | |
लेखक | पारंपारिकपणे व्यास लिखीत |
भाषा | संस्कृत |
देश | भारत |
साहित्य प्रकार | धर्मग्रंथ |
भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध.
त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली.
यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे.
गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे.
भगवत् गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. ‘महाभारत’ या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.
सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते.
कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे..
भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!)
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला ‘योगोपनिषद’ किंवा ‘गीतोपनिषद’ ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला ‘उपनिषदांचे उपनिषद’ असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे. इस्कॉन संघटना भगवद्गीता सर्व लोकांना पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे..
गीता निर्मितीचा काळ
महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती ‘गायली’ जाते.
उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता ‘महर्षी व्यास’ यांनी लिहिली असे मानले जाते.
छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली.
हिंदुस्थानातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते आध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही..
गीतेच्या विविध आवृत्त्या व संबंधित ग्रंथ संपदा
भगवद्गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, इतकेच काय, पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायांत गणेशगीता आहे.
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः
॥ १८.६६ ॥
सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस.
गीतेतील अध्याय
अध्याय | शीर्षक | श्लोक |
पहिला | अर्जुनविषादयोग | ४७ |
दुसरा | सांख्ययोग(गीतेचे सार) | ७२ |
तिसरा | कर्मयोग | ४३ |
चौथा | ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान) | ४२ |
पाचवा | कर्मसंन्यासयोग | २९ |
सहावा | आत्मसंयमयोग | ४७ |
सातवा | ज्ञानविज्ञानयोग | ३० |
आठवा | अक्षरब्रह्मयोग | २८ |
नववा | राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान) | ३४ |
दहावा | विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य) | ४२ |
अकरावा | विश्वरूपदर्शनयोग | ५५ |
बारावा | भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा) | २० |
तेरावा | क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग | ३४ |
चौदावा | गुणत्रयविभागयोग | २७ |
पंधरावा | पुरुषोत्तमयोग | २० |
सोळावा | दैवासुरसंपद्विभागयोग | २४ |
सतरावा | श्रद्धात्रयविभागयोग | २८ |
अठरावा | मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष) | ७८ |
एकूण श्लोक | ७०० |
गीतेची अठरा नावे
गीता, गंगा, गायत्री,
सीता, सत्या, सरस्वती|
ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली,
त्रिसंध्या, मुक्तगेहिनी||
अर्धमात्रा, चिदानंदा,
भवग्नी, भयनाशिनी|
वेदत्रयी, परा, अनंता,
तत्त्वार्थज्ञानमंजिरी||
ही गेय स्वरूपातली गीतेची अठरा नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते,
अधिकरणे
१ ऐतिह्य कथन, २ दैन्य प्रदर्शन, ३ श्रीकृष्णास शरण, ४ आत्मप्रबोधन, ५ स्वधर्मपालन, ६ बुद्धियोग, ७ स्थितप्रज्ञता, ८ कर्मयोग, ९ नित्यकर्म, १० लोकसंग्रह, ११ शासनपालन, १२ शत्रुसंहार, १३ जन्मकर्म, १४ कर्म-अकर्म, १५ प्राज्ञमुखें ज्ञान, १६ सांख्ययोग, १७ सदामुक्तता, १८ योगारुढ होणें, १९ समाधि अभ्यास, २० शाश्वत योग, २१ एकसूत्रता, २२ शरणता, २३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन, २४ संतत स्मरण, २५ भूत लय-उत्पत्ति, २६ बोधक्षयोदय, २७ ईश्वरी सत्त, २८ हरिभावना, २९ निष्काम भक्ति, ३० ईशस्मरण, ३१ विभूतिसंक्षेप, ३२ विभूतिविस्तार, ३३ ईश्वरी रूप, ३४ ईश्वरी रूपावलोकन, ३५ क्षमापनस्तोत्र, ३६ रूपविसर्जन, ३७ भक्ततुलना, ३८ सुलमसाधन, ३९ ईश्वरगुणगान, ४० क्षेत्राक्षेत्रशोधन, ४१ प्रकृतित्याग, ४२ निर्लिप्त आत्मता, ४३ त्रिगुण संसार, ४४ गुणमुक्तता, ४५ वृक्ष (अश्वत्थ) छेन्न, ४६ जीवात्मादर्शन, ४७ जीवनव्याघ्र, ४८ पुरुषोत्तम, ४९ दोन संपदा, ५० असुरवर्णन, ५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें, ५२ श्रद्धाविभाग, ५३ स्वाभाविक गुण, ५४ आहार यज्ञाचारण, ५५ ॐ तत्सदर्पण, ५६ त्यागमीमांसा, ५७ कर्मनिर्णय, ५८ त्रिधावृत्ति, ५९ पूर्णसाधना व ६० अर्जुनबोध, हीं साठ गीतेचीं अधिकरणें अथवा विषय होत.
भगवद्गीतेवर आधारित
अन्य मराठी/संस्कृत/हिंदी ग्रंथ
** प्रथम मराठी भाष्य :- ज्ञानेश्वरी (भावार्थ दीपिका) – संत ज्ञानेश्वर (वारकरी संप्रदायाचे संस्थापक)
** अनासक्ति योग – महात्मा गांधी
** आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य (अरुण तिवारी)
** ईश्वरार्जुन संवाद- परमहंस योगानन्द
** A Modern Interpretation of Geeta Rahasya (अरुण तिवारी)
** Essays on Gita – अरविंद घोष
** भगवद्गीता जशी आहे तशी (इस्कॉनचे संस्थापक ए.सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद)
** गीताई – विनोबा भावे; गीताईच्या पहिल्या काही ओळी : त्या पवित्र कुरुक्षेत्रीं, पांडूच़े आणि आमुच़े । युद्धार्थ ज़मले तेव्हां वर्तले काय संजया ॥
** गीता तत्त्वमंजरी अर्थात निर्लेप कर्मशास्त्र (ज.स. करंदीकर,१९४७)
** गीता तत्त्व विवेचनी टीका – गोरखपूर येथील गीताप्रेसचे संस्थापक व कल्याण पत्रिकाचे सूत्रधार सेठजी (जयदयाल गोयंदका)
** गीतानुभूती (गीतेच्या १२ अध्यायांचे निरूपण, लेखिका – माधुरी दांडेकर)
** गीता पर्व : ईश्वराचा शोध, पूर्वार्ध-उत्तरार्ध (गणेश जगन्नाथ कांगुणे)
** गीता-प्रवचन (हिंदी वगैरे)- विनोबा भावे
** गीतार्णव (सव्वा लक्ष ओव्यांचा ग्रंथ – दासोपंत)
** श्रीगीतार्थबोध (कृ.ह. देशपांडे)
** गीताभाष्य (संस्कृत) – आदि शंकराचार्य
** गीताभाष्य (संस्कृत) – रामानुज
** गीतारहस्य (बाळ गंगाधर टिळक); + आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य (अरुण तिवारी)
** गीता समजावणी – डॉ. पां.ह. कुलकर्णी
** गीता साधक संजीवनी (टीका) – स्वामी रामसुखदास
** गीतेचा इंग्रजी अनुवाद (नारायण वासुदेव गोखले)
** गीतेचे दोन भाष्यकार : शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर (नारायण वासुदेव गोखले)
** गीतेत काय आहे ? (नारायण वासुदेव गोखले)
** गीतेवरील चार-पाच टीकाग्रंथ (दासोपंत)
** गूढार्थदीपिका टीका – मधुसूदन सरस्वती
** झोपाळ्यावरची गीता (अनंततनय)
** भगवद्गीता काय शिकवते? (डॉ. मुकुंद दातार)
** भगवदगीता का सार (हिंदी) – स्वामी क्रियानंद
** श्रीमद्भगवद्गीता – एक आश्वादक वाचन (डॉ. मधुकर तडवलकर)
** श्रीमद्गीतानुवाद (मराठी समश्लोकी, शि.शा. कुलकर्णी)
** श्रीमद्भगवद्गीता मूल, पदच्छेद, अन्वयार्थ व सुगमटीपांसह (मराठी, जयदयाल गोयन्दका)
** श्रीमद्भगवद्गीता : सान्वयपदबोध सार्थ आणि सटीक (१९०२, कृष्णराव अर्जुन केळूसकर). या ग्रंथाची दुसरी आवृत्ती दामोदर सावळाराम यंदे यांनी १९३०मध्ये काढली.
** श्रीमद्भवद्गीतारहस्य (गीतारहस्य) – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक)
** भगवद्गीता सर्वांसाठी (विनय पत्राळे)
** भगवद्गीतेचे समश्लोकी हिंदी रूपांतर (नारायण वासुदेव गोखले)
** श्रीमत् भावार्थ गीता (मराठी समश्लोकी, कवी – (पावसचे) स्वामी स्वरूपानंद) : पहिल्या काही ओळी : धृतराष्ट्र म्हणे, ‘कुरुक्षेत्र जें पावन धर्मस्थान । संग्रमास्तव उभे ठाकले तिथें घेउनि बाण ॥ …
** मला समजलेली भगवद्गीता (अरुण पानसे)
** माझी गीता (विषयवार पुनर्लेखित भगवद्गीता ; मूळ इंग्रजी लेखक देवदत्त पट्टनायक, मराठी अनुवादक – अभय सदावर्ते)
** मुलांची गीता (वि.कृ. श्रोत्रिय)
** मोक्ष का मुक्ती ? – अजय रा. पवनीकर
** सुबोधिनी टीका (संस्कृत) – श्रीधर स्वामी ज्ञानेश्वरी – संत (ज्ञानेश्वर)
भगवद्गीतेचे गीतेचे साठ अधिकरणें
१ ऐतिह्य कथन,
२ दैन्य प्रदर्शन,
३ श्रीकृष्णास शरण,
४ आत्मप्रबोधन,
५ स्वधर्मपालन,
६ बुद्धियोग,
७ स्थितप्रज्ञता,
८ कर्मयोग,
९ नित्यकर्म,
१० लोकसंग्रह,
११ शासनपालन,
१२ शत्रुसंहार,
१३ जन्मकर्म,
१४ कर्म-अकर्म,
१५ प्राज्ञमुखें ज्ञान,
१६ सांख्ययोग,
१७ सदामुक्तता,
१८ योगारुढ होणें,
१९ समाधि अभ्यास,
२० शाश्वत योग,
२१ एकसूत्रता,
२२ शरणता,
२३ मोह त्यागून ज्ञानविज्ञान साधन,
२४ संतत स्मरण,
२५ भूत लय-उत्पत्ति,
६ बोधक्षयोदय,
२७ ईश्वरी सत्त,
२८ हरिभावना,
२९ निष्काम भक्ति,
३० ईशस्मरण,
३१ विभूतिसंक्षेप,
३२ विभूतिविस्तार,
३३ ईश्वरी रूप,
३४ ईश्वरी रूपावलोकन,
३५ क्षमापनस्तोत्र,
३६ रूपविसर्जन,
३७ भक्ततुलना,
३८ सुलमसाधन,
३९ ईश्वरगुणगान,
४० क्षेत्राक्षेत्रशोधन,
४१ प्रकृतित्याग,
४२ निर्लिप्त आत्मता,
४३ त्रिगुण संसार,
४४ गुणमुक्तता,
४५ वृक्ष (अश्वत्थ) छेन्न,
४६ जीवात्मादर्शन,
४७ जीवनव्याघ्र,
४८ पुरुषोत्तम,
४९ दोन संपदा,
५० असुरवर्णन,
५१ शास्त्रीय संयमानें नरकद्वार टाळणें,
५२ श्रद्धाविभाग,
५३ स्वाभाविक गुण,
५४ आहार यज्ञाचारण,
५५ ॐ तत्सदर्पण,
५६ त्यागमीमांसा,
५७ कर्मनिर्णय,
५८ त्रिधावृत्ति,
५९ पूर्णसाधना व
६० अर्जुनबोध,
हीं साठ गीतेचीं अधिकरणें अथवा विषय होत.