ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.482
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८२
अक्षरची ब्रह्म तेंचि तें क्षरलें । काल्पनिक झाला अनेकत्व ॥१॥ जिवेश्वर खाणी तेथें उमटती । शेखी तेथे जाता मिळोनियां ॥२॥ ब्रह्म अनुपम्य संवितेशी नये । अनुभव सोये तरी कळे ॥३॥ पाथराची टाकी जरी होष तीख । नये रंध्र शलाख मुक्तिकेशी ॥४॥ सर्वाहुनी पर म्हणे ज्ञानेश्वर । ब्रह्मज्ञान कीर अगोचर ॥५॥
अर्थ:-
अविनाशी असणारे ब्रह्न तेच काल्पनिक असलेल्या अनेकात्वाला प्राप्त झाले. त्यात एक जीवसृष्टी व दुसरो ईशसृष्टी ही असून शेवटी विचाराने यांचा बोध झाल्यावर या दोन्ही सृष्टी एकरूप होतात. अनुभवावाचून निरुपमेय ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होऊ शकत नाही. पाथरवटाची टाकी कितीही बारीक असली तरी तिने मोत्याचा तुकडा पाडाता येत नाही.. किंवा त्यास भोक ही पाडता येत नाही. त्याप्रमाणे सूक्ष्म ज्ञानदृष्टी वाचुन ब्रह्मज्ञान होणार नाही ब्रह्मज्ञान हे अव्यक्त असून अत्यंत अगोचर आहे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.