ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.938
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके पाईक अभंग ९३८
जागतां नीज आलें असें हातां । मग पाईक म्हणवित लाज वाटे ॥ नव्हे कोणाजोगा नाईके म्हणितलें । उणेपणें आलें पाईकपणा ॥१॥ पाईक शुद्धमति स्वामीया विवेकी । वेव्हारू लौकिकी चाळीतु असे ॥२॥ निदसुरा होता तो जागसुदा जाला । स्वामियें आणिला आपणापाशीं ॥३॥ पाईकपणे गेलें सन्निधान जालें । स्वामी एका बोलें निवांत ठेला ॥४॥ मागावें तितुकें खुंटलें तेथें । न मागतां आपणांते जाणितलें । बापरखुमादेविवरा विठ्ठला प्रसादें । पाईक परी अभेदें उरला असे ॥५॥
अर्थ:-
आपल्या यथार्थ आत्मस्वरूपाविषयी नित्य जागृति ठेवली तर आपले निज म्हणजे यथार्थ परमात्मस्वरूप आपुले हाती आले मग सेवक म्हणवून घेण्यास संकोच वाटतो. परमात्मा अमुकस्वरूपाचा आहे. तमुकस्वरूपाचा आहे. असे त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. कारण तो शब्दाचा विषय नाही. अशा परमात्म्याचा मी पाईक आहे.हे म्हणणेच उणेपणाचे आहे. लौकिक भागांत शुद्धबुद्धीचा सेवक आणि विचारवंत धनी यांचा व्यवहार असाच असतो. आत्मस्वरूपांच्या विस्मृतीत जीव निजलेला होता. तो आत्मस्वरूपाच्या जागृतीत आला. म्हणजे स्वामीनी त्याला आपल्या स्वरूपाशी एकरूप केले. अर्थात् स्वामीरूप झाल्यामुळे त्याचा सेवकपणा गेला. तो स्वामी श्रीगुरूरायांनी एका बोलात निवांत करून ठेविला. आतां स्वामीजवळ मागावयाचे म्हणून सर्व खुंटले कारण न मागताच त्याच्याकडून त्याचे परमात्मस्वरूप जाणवले. परमात्मरूप धनी जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांच्या प्रसादानें परमात्म्याशी अभिन्न होऊनहि सेवकपणाने उरला आहे.असे माऊली सांगतात.