ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.671
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६७१
सुखादि सुख तें जालें अनमीष । पाहाणें तेंचि पारुषलें ॥१॥ काय सांगू मातु वेगळीच धातु । जिवा हा जिवांतु व्यापुनी ठेला ॥२॥ नचले नचले कांही कौटाल कामान । देहींच विंदान रचिलें गे माये ॥३॥ बापरखुमादेविवरें विठ्ठले निटें । वायांवीण विटे मिस केलें ॥४॥
अर्थ:-
सर्व सुखाचे आदि जे परमात्मसौख्य ते प्राप्त होण्यास एकही क्षण वेळ लागला नाही. ज्या ज्ञानांनी त्याला पहावयास गेले ते ज्ञानही तद्रूप झाले. परमात्म दर्शनाची गोष्ट काही वेगळीच आहे. ते शब्दाने सांगता येणे शक्य नाही.तो परमात्मा सर्व जगांत व्याप्त आहे.ते परमात्म स्वरुप प्राप्त होण्याकरितां कांही मोठ्या गुढविद्या संपादन करण्याची जरुरी नाही. तो देहामध्येच मोठ्या गंमतीने भरला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना स्वतःला कांही जरुरी नसता त्यानी सर्व लोकांना दर्शन देण्याकरिता विटेवर उभा राहाण्याचे एक निमित्त केले आहे असे माऊली सांगतात.