ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.479
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४७९
पिंडचि ब्रह्मांड ब्रह्मांडचि पिंड । ब्रह्मचि अखंड ब्रह्मरुप ॥१॥ कांहीं भेद नाही किंचित् महत् । उपाधि कल्पित स्वाभाविक ॥२॥ अनुभव योगें दोन्हीं जाण सम । नाहींचि विषम अणुभरी ॥३॥ सहजचि सृष्टी जाणा हे घडली । सहजचि गेली शेखीं आथी ॥४॥ एकमेव सर्व म्हणे ज्ञानेश्वर । नाहीं भिन्न कीर ओळखतां ॥५॥
अर्थ:-
पिड ते ब्रह्मांड व ब्रह्मांड ते पिंड हे दोन्ही तात्विक दृष्टीने एकच आहेत कारण त्यांना अधिष्ठान असणारे ब्रह्म दोन्ही ठिकाणी अखंड एकरूपच आहे. पिंड ब्रह्माडांमध्ये बिलकूल भेद नाही. जर भेद दिसत असलाच तर तो उपाधिचाच होय ब्रह्माडांची उपाधि पिंडापेक्षा मोठी आहे. अनुभवाच्या दृष्टीने पाहाल तर त्यात विषमता मुळीच नाही. दोन्ही अगदी एकच आहेत. ही सृष्टी त्या अधिष्ठान ब्रह्मावर जशी मायेमुळे भासते. तशी मायेच्या बाधेने ती नाहीशी होते. सर्व काही एकमय आहे. खरोखरच दुसरी वस्तुच नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात