ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.477
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४७७
मन हे अवघे परब्रह्मीं । क्रियाकर्मधर्मी अलिप्त तें ॥१॥ देह जावो राहो संबंधचि नाहीं । नामरुप कांहीं न दिसे मज ॥२॥ प्राचिनानें वर्तो जाणो या शरीरी । जैसा वेठी करी राबताहे ॥३॥ निर्विकल्प स्थिति हेतु नाहीं आथी । अज्ञानाची बुंथी काढियली ॥४॥ म्हणे ज्ञानेश्वर उरी नाहीं आन । जाहालों तल्लीन निजरूपी ॥५॥
अर्थ:-
माझे मन परब्रह्माच्या ठिकाणी बसले आहे. क्रिया, कमें वगैरेचे ठिकाणी मुळीच नाही. देह जावो किंवा राहो त्याचा माझा मुळीच संबंध नाही. जगातील नामरूपामुळे येणारा भेद मला मुळीच दिसत नाही. ज्याप्रमाणे बिगारीस धरलेला मनुष्य सांगावे तिकडे जातो. त्याप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे या शरीराने मी वागत आहे.अज्ञानाचे आवरण काढल्यामुळे व अंतःकरणांत दुसरा कोणताही हेतु नसल्यामुळे मी निर्विकल्प स्थितीत आहे. माझ्या ठिकाणी दुसरी कसलाही वासना न राहिल्यामुळे. आत्मस्वरूपांत मी निमग्न झालो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.