ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.446
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१२ वे, गीतामहात्म्य अभंग ४४६
व्यर्थ प्रपंच टवाळ । सार एक निर्मळ । कृपा करी हरी कृपाळ । दीन दयाळ हरी माझा ॥१॥ क्षमा शांती दया रूपी । तोची उरेल स्वरूपी । नामें तरले महापापी । ऐसा ब्रह्मा बोलिला ॥२॥ गीतेमाजी अर्जुनाशी । हरि सांगे साक्षी जैशी । जो रत होतसे हरिभक्तीशी । तो नेमेशी तरेल ॥३॥ ज्ञानदेवें भाष्ये केलें । गीता ज्ञान विस्तारलें । भक्ती भाग्यवंती घेतलें । भाष्ये करूनी गीतेच्या ॥४॥
अर्थ:-
सर्व संसार निष्फळ व मिथ्या आहे. परंतु भगवंताचे नाम हे सर्वांचे सार असून पवित्र आहे. ते नामस्मरण करणाऱ्या नामधारकावर कृपाळु श्रीहरि कृपा करतो. ज्याच्या ठिकाणी शांती क्षमा दया आहेत अशा उत्तम मुमुक्षुला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. परंतु नामस्मरणाने मात्र अजामेळा सारखा महापापी जरी असला तरी तो उद्धरून जातो. असे ब्रह्मदेवांनी सांगीतले आहे. तसेच भगवंताने भगवद्गीतेमध्येही अर्जुनाला म्हंटले आहे. जो मज होय अनन्य शरण । तयाचे निवारी मी जन्ममरण, अशी साक्ष दिल्याप्रमाणे आहे. जो मला अनन्यभावाने शरण येतो तो कितीही महापापी असला तरी मी त्याचा नामस्मरणामुळे उद्धार करतो. मी गीतेवर मराठीत भाष्य केले म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’लिहीली अर्थात ‘भावार्थ दीपीका’ लिहीली त्यामुळे या ज्ञानाचा विस्तार झाला या ज्ञानाचा लाभ जे भाग्यवान भक्त आहेत त्यांनी घेतला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात..