ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.329
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-९ वे, करुणा अभंग ३२९
पडलें दूरदेशी मज आठवे मानसी । नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासी ॥ दिनु तैसी रजनी मज जालिये वो माये । अवस्था लावुनी गेला अजुनी कां न ये ॥ गरुडवाहना गंभिरा येई गा दातारा । बापरखुमादेवीवरा श्रीविठ्ठला ॥
अर्थ:-
अज्ञानामुळे दूर देशांत येऊन पडले त्यामुळे रात्रंदिवस मला तुझी आठवण येते. हा तुझा वियोग मला अगदी असाह्य झाला आहे. त्यामुळे माझ्या जीवाला फार कष्ट होत आहेत. पण तुझी भेट अजून का होत नाही. हे कळत नाही. हे गंभिरा गरुडवाहना दयानिधी श्रीकृष्णा हे रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठला तुम्ही लवकर धावत येऊन मला भेट द्या. असे माऊली सांगतात.