दसरा आश्विन शुद्ध दशमी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
श्रीराम
१. तिथी
‘आश्विन शुद्ध दशमी

. व्युत्पत्ती आणि अर्थ
दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

. समानार्थी शब्द
अ. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.

आ. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.’

४. इतिहास
अ. ‘रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णांचा वर्षाव केला. कौत्साने केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजनांनी नेले.’

(कौत्साने आवश्यक तेवढ्याच सुवर्णमुद्रा घेतल्या आणि रघूने कौत्साला नको असलेल्या सर्व सुवर्णमुद्रा वाटून टाकल्या. ही आहे हिंदु संस्कृती ! कुठे त्यागावर आधारलेली महान हिंदु संस्कृती, तर कुठे प्रत्येक गोष्टीचा हव्यास असलेले सध्याचे राज्यकर्ते आणि जनता ! – संकलक)

आ. ‘प्रभु श्रीराम याने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले आहे.

इ. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.

ई. दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.

खालील चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

उ. हा सण एक कृषीविषयक लोकोत्सव म्हणूनही साजरा होत असे. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.

५. महत्त्व
हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.

६. सण साजरा करण्याची पद्धत
या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

अ. सीमोल्लंघन
अपराण्हकाली (तिसर्‍या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात.

आ. शमीपूजन

पुढील श्लोकांनी शमीची प्रार्थना करतात.

शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका ।
धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ।।
करिष्यमाणयात्रायां यथाकाल सुखं मया ।
तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ।।

अर्थ : शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय असून अर्जुनाच्या बाणांना धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.

इ. आपट्याचे पूजन
आपट्याची पूजा करतांना असल्यास पुढील मंत्र म्हणतात –

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।

अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

आपट्याचे पान
इ १. आपट्याची पाने सोने म्हणून देणे
शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.

ई. अपराजितापूजन
ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।

अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.

उ. शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन
शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन
शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन

या दिवशी राजे, सामंत आणि सरदार हे वीर आपापली उपकरणे आणिशस्त्रांचे पूजन करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.

उ १. राजविधान
दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.

७. लौकिक प्रथा
काही घराण्यांतील नवरात्रींचे विसर्जन नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी करतात.’

दसरा आणि सुवर्ण मुद्रा वर्षाव

दसरा म्हणजेच विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस.

दसरा ह्या सणांच मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्य योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात. पुस्तक प्रकाशीत केली होतात.

ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी. आपट्याच्या पानाला सोन्याच मोल कां आणि कसं आल ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी की – फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता.

एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्याचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी! तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केल. त्या बदल्यांत आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरुवरतंतू म्हणाले, “ बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा बरं!”

पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला मग गुरु म्हणाले, “ मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.” कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षांत ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली.पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला तू तीन दिवसांनी ये असं सांगितलं.

रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः ती मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला हवं तेवढं धन घे म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता.

त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात-घेतात. ह्या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा एक दिवस सुंदर सण-दसरा.

माहिती संकलन: प्राची तुंगार

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

दसरा अभंग

१.
दसरा दिवाळी तोची आम्हा सण ।
सखे संत जन भेटतील ।।
अमूप जोडिल्या सुखाचिया राशी ।
पार या भाग्यासी नाही आता ।।
धन्य दिवस आजी झाला सोनियाचा ।
पिकली हे वाचा रामनामी ।।
तुका म्हणे काय होऊ उतराई ।
जीव ठेऊ पायी संताचिया ।।

२.
दया तिचे नांव भूतांचे पाळण ।
आणिक निर्दाळन कंटकाचे ।।1
धर्मनीती चा हा ऐका व्यवहार।
निवडीले सार असार ते।।2
पाप त्याचे नांव न विचारता नित।
भलतेची उन्मत्त सदा करी ।।3
तुका म्हणे धर्मरक्षावयासाठी ।
दिवसही आटी जन्म घेणे।।4

३.
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जयजयकार हरि ह्र्दयी धरा । आळस नका करू लहाना सांगतो थोरा ॥१॥
या हो या हो बाइयानों निघाले हरि । सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं ।
ओवाळू श्रीमुख वंदू पाऊले शिरीं । आम्हा दैव आले येथे घरिच्या घरीं ॥२॥
अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते । मग येरी गर्जे जैसें तैसे होत जाते ।
म्हणोनि मागे पुढे कोणी न पहावे येथे । सांडा परते काम जाऊ हरि सांगाते ॥३॥
बहुतां बहुतां रीतीं चित्तिं धरा हे मनीं । नका करू आइकाल ज्या कानी ।
मग हे सुख तुम्ही कधीं न देखाल स्वप्नी । उरेल हाय हाय मागे होईल कहाणी ॥४॥
ऐसियास वंचतां त्याच्या अभाग्या पार । नाही नाही नाही सत्य जाणा निर्धार ।
मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळले असो द्या मग पडतील विचार ॥५॥
जयासाठी ब्रम्हादिक झाले ते पिसे । उच्छिष्टाकारणें देव जळीं झाले मासे ।
अर्धांगीं विश्वमाता लक्ष्मी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥६॥

४.
आम्हां देणे धरा सांगतों ते कानी ।
चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥
तेणे माझे चित्ता होय समाधान ।
विलास मिष्टान्न नलगे सोनें ॥२॥
व्रत एकादशी द्वारी वृंदावन ।
कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥३॥
तुका म्हणे त्याचे घरींची उष्टावळी ।
मज ते दिवाळी दसरा सण ॥४॥

५.
धन्य आजि दिन । झाले संताचे दर्शन ॥१॥
झाली पापा तापा तुटी । दैन्य गेलें उठाउठी ॥२॥
झाले समाधान । पायी विसावलें मन ॥३॥
तुका म्हणॆ आले घरां । तोचि दिवाळी दसरा ॥४॥

६.
194    भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥
जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥
संतसमागमें दसरा दिवाळी । ठेवूनि निढळीं बाहे सदाअ ॥३॥
सखे पंढरीचे येती वारकरी । आर्त निरंतरीं त्यांचे पायीं ॥४॥
नामा म्हणे ऐसें करी दंडवत । आमुतें पुनीत करी बापा ॥५॥

७.
195    भेटीची आवडी उत्कंठित चित्त । न राहे निवांत एके ठायीं ॥१॥
जया देखे तया हेंचि पुसे मात । कां मज पंढरिनाथ बोलविना ॥२॥
कृपेचा सागर विठो लोभपर । माझा कां विसर पडिला त्यासि ॥३॥
माहेरींची आस दसरा दिवाळी । बाहे ठेवुनि निढळ वाटे पाहे ॥४॥
मखे वारकरी पंढरीस जाती । निरोप त्या हातीं पाठवीन ॥५॥
निर्बुजला नामा कंठीं धरिला प्राण । करीतसे ध्यान रात्रंदिवस ॥६॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *