पंच महायज्ञ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

*पंच महायज्ञ*

गृहस्थाश्रमामध्ये कळत-नकळत दैनंदिन जीवनात पाच प्रकारची पापे होत असतात.

१) कण्डनं– कांडणे,

२) पेषणी – दळणे,

३) चुल्ली – चूल पेटविणे,

 ४) उदकुम्भी – पाणी भरून ठेवणे ,

५) मार्जनी – झाडलोट वगैरे

वरील सर्व क्रियांच्यामधून मनुष्य अनेक जीवाणूंची हिंसा करीत असतो.त्यासाठी प्रत्येक गृहस्थाश्रमीने पाच यज्ञ करावेत.

*१. भूतयज्ञ*

 आपण अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्यातील एक भाग चिमण्या वगैरे पक्ष्यांना द्यावा, कारण आपले जीवन समृद्ध करण्यामध्ये अनेक पशुपक्ष्यांचा सहभाग असतो.

*२. अतिथियज्ञ*

 जो कोणी आपल्याकडे येईल त्याला श्रद्धेनेअन्नदान करावे.आपले शास्त्र सांगते की  *अतिथिदेवो भव*

*३. पितृयज्ञ*

 पितरांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध होत असल्यामुळे त्यांच्यासाठी एक भाग द्यावा.

*४. देवयज्ञ*

 देवांसाठी एक भाग अर्पण करावा.

*५. वैश्वदेव यज्ञ*

 एक भाग अग्निकुंडामध्ये आहुती देवून विश्वकर्त्या परमेश्वराला अर्पण करावा.याप्रकारे, हे पंचयज्ञ केल्यानंतर राहिलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे.अन्न शिजवून झाल्यानंतर पंचयज्ञ झाल्याशिवाय अन्नाचे कधीही सेवन करू नये.म्हणजे तो उपभोग होत नाही, तर श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने ग्रहण केल्यामुळे तो प्रसाद होतो.ती प्रसादबुद्धि चित्तशुद्धीचे साधन होते.म्हणजेच प्रमाद, हिंसा, दुसऱ्याला अपमानात्मक बोलून यातना देणे वगैरेदि पापांच्यापासून तो मुक्त होवून सदाचारी, सत्शील होतो.मनशुद्ध झाल्यामुळे तो सत्त्वगुणप्रधान होतो.

*वैश्वदेव*

वैश्वदेव, अग्नीहोत्र आणि नैमित्तिक यज्ञ हे देवयज्ञाचे भाग आहेत.

नित्य उपजीविका करत असतांना मानवाच्या हातून नकळत होणारी जीवहिंसा शास्त्रात ‘पंचसूना’ या नावाने ओळखली जाते.

*वैश्वदेवः प्रकर्तव्यः पञ्चसूनापनुत्तये ।*
*कण्डनी पेषणी चुल्ली जलकुम्भोपमार्जनी ।।*

 धर्मसिन्धु, परिच्छेद ३, पूर्वार्ध

कांडणे, दळणे, चुलीचा उपयोग करणे, पाणी भरणे आणि झाडणे या पाच क्रिया करतांना सूक्ष्म जीवजंतूंची हिंसा अटळ असते. या हिंसेला ‘पंचसूना’ जीव हिंसा म्हणतात. या हिंसा हातून घडल्या, तर त्यांची दखल घेऊन त्यांचा आपल्या मनावर होणारा पापसंस्कार दूर होण्यासाठी ‘वैश्वदेव’ हे प्रायश्चित्तांगभूत कर्म नित्य करावे.

 *वैश्वदेव विधी*

 अग्नीकुंडात ‘रुक् मक’ किंवा ‘पावक’ नावाच्या अग्नीची स्थापना करून अग्नीचे ध्यान करावे. अग्नीच्या सभोवती सहा वेळा पाणी फिरवून अष्टदिशांना गंध-फूल वहावे आणि अग्नीत चरूच्या (शिजवलेल्या भाताच्या) आहुती द्याव्यात. त्यानंतर अग्नीच्या सभोवती पुन्हा सहा वेळा पाणी फिरवून अग्नीची पंचोपचार पूजा करावी आणि विभूती धारण करावी.

 उपवासाच्या दिवशी तांदळाच्या आहुती द्याव्यात. (उपवासाच्या दिवशी तांदूळ शिजवत नसल्याने आहुत्या चरूच्या न देता तांदळाच्या देतात.)

अतीसंकटसमयी केवळ उदकानेही (देवतांच्या नावांचा उच्चार करून ताम्हणात पाणी सोडणे) हा विधी करता येतो.

प्रवासात असल्यास केवळ वैश्वदेवसूक्त किंवा वरील विधी नुसता तोंडाने म्हणूनही पंचमहायज्ञाचे फळ मिळते. 

*भूतयज्ञ बलीहरण*

वैश्वदेवाकरिता घेतलेल्या अन्नाच्या एका भागातून देवतांना बली अर्पण करतात. भूतयज्ञात बली अग्नीत न देता भूमीवर ठेवतात.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *