ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.466
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-१३ वे, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४६६
त्रिपुटी भेदुनी मनाच्या मौळीं । तें आलें भूमंडळी पंढरीये ॥१॥ नाम लाधलें नाम लाधलें । पुंडलिके केलें खेवणें देखा ॥२॥ समर्थाचे पायी भोजन जालें । पंचामृत घेतले धणीवरी ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलेंसी तृप्ती । यथार्थ भाविता कळों येईल चित्ती ॥४॥
अर्थ:-
ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय इत्यादी त्रिपुटीचा भेद करून जो परमात्मा भक्तांकरिता मनाचा मवाळ होऊन भूमंडळी पंढरीत अवतीर्ण झाला. त्याचे नांव आम्हाला प्राप्त झाले, पण हे सगळे नामालंकार देण्यात उपकार त्या पुंडलिकाचे आहेत. त्यामुळे आज समर्थाच्या पंक्तीला भोजन होउन तृप्ती होईपर्यंत पंचामृताचे पान केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्याबरोबर आज आम्हाला तृप्ती झाली आहे. हे यथार्थ भाविकपणाने पाहीले तर चित्तात कळून येईल.असे माऊली सांगतात.