ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.493
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४९३
एकचि मीपणें नागविलें घर । नाहींतरी संसार ब्रह्मरूप ॥१॥ प्रवृत्ति निवृत्ति दोन्ही मुळीं नाहीं । कल्पनेने पाहीं भ्रमताती ॥२॥ ते एक त्यागिता काय आहे वाणी । कैवल्याचा धनी तोचि होय ॥३॥ जन्म मृत्यू भोग भोगणे यालागीं । टाकोनिया संगी राहीं बापा ॥४॥ म्हणे ज्ञानदेव मग होशी मुक्त । नव्हेचि आसक्त सर्वथैव ॥५॥
अर्थ:-
देहाभिमानामुळे जीवाची फसवणूक झाली आहे. जीवाने विचार करून तो देहाभिमान सोडून दिला दिला तर जीवाचा संसार ब्रह्मरुपच होईल. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वस्तुतः कर्माची प्रवृत्ति किंवा निवृत्ती या दोन्ही मुळातच नाही असे असूनही त्याची कल्पना आत्म स्वरूपांच्या ठिकाणी करून जीव भ्रमिष्ठ होतात.काय चमत्कार पहा, जर एक देहाभिमान त्यानी टाकला तर त्यांना मोक्षाची वान कसली? फार काय तोच मोक्षाचा अधिपती होईल. या करिता जन्म मृत्य इत्यादी भोगांचा जोगांचा संबंध टाकून राहा. असे केले तर कोठेही आसक्त न होता मुक्त होशील. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
वै. भाईनाथ महाराज समाधी मंदिर, वेळापूर