85 पैश्याचे १५ अनर्थ कष्टाची कमाई
85 पैश्याचे १५ अनर्थ कष्टाची कमाई
वाराणसीत एका पंडिताचा मोठा आश्रम होता. तेथे ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत असत. त्यांच्या या आश्रमासमोर एक सुतार काम करत असे. तो आपले काम करीत असताना मधुर भजनही गात असे. पंडितजी मात्र भजनाकडे लक्ष देत नसत. काही दिवसानंतर पंडितजी खूप आजारी पडले. हळूहळू त्यांचे अर्ध्यापेक्षा शिष्य आश्रम सोडून गेले. काही सेवाभावी शिष्य पंडितजींचे काम चालवत होते आणि पंडितजी अंथरुणावर पडल्या पडल्या सुताराचे भजन ऐकत असत आणि त्यांना ते आवडायचेही. हळूहळू त्यांचे लक्ष भजनावर केंद्रित होवू लागले.
एके दिवशी त्यांनी त्या सुताराला प्रथमच आपल्या शिष्याकरवी आश्रमात येण्याचे आमंत्रण दिले. सुतार आश्रमात आला. पंडितजींनी त्याला आपल्या जवळ बसविले व म्हणाले,”अरे मित्रा! तू किती सुंदर भजन गातोस! साक्षात देवाने तुला वरदहस्त दिला आहे असे वाटते, तुझ्या या सुंदर भजन गाण्याने माझा आजार आता खुपसा कमी झाला आहे. यासाठी मी तुला काही देवू इच्छितो.” असे म्हणून त्यांनी त्याला शंभर रुपये दिले व सांगितले कि तू असाच दैवी आवाजात भजने गा. सुतार पैसे बघून खूप खुश झाला. त्याचे त्या पैशांमुळे कामावरून लक्ष उडाले. सारखे त्या पैशांची काळजी घेण्यात त्याचा वेळ जावू लागला. पर्यायाने त्याचे भजन गाण्याकडे हि दुर्लक्ष झाले. तो रात्रंदिवस याच चिंतेत होता कि, “हे एवढे पैसे मी कोठे ठेवू ?”
अश्याने त्याचे ग्राहक कमी कमी होत गेले. एके दिवशी तो परत पंडितजींकडे गेला व त्यांना शंभर रुपये परत करत म्हणाला ,”पंडितजी! हे परक्याचे धन आहे. त्यात ते विनाकष्टाचे आणि बक्षीस स्वरूपातील आहे. त्याला कष्टाच्या कमाईची गोडी नाही. तेंव्हा हे परत घ्या.” असे बोलून तो तेथून निघून गेला. दुसरे दिवशी पंडितजींना सुताराचे सुरेल भजन ऐकू आले.
तात्पर्य- विनाकष्टाचे धन अशांततेचे कारण असते. कष्टाची कमाई मनाला सुख देते आणि आनंदही ! खरेय ना!
स्तेयं हिंसानृतं दम्भः कामः क्रोधः स्मयो मदः ।
भेदो वैरमविश्वासः संस्पर्धा व्यसनानि च ॥ १८ ॥
एते पञ्चदशानर्था ह्यर्थमूला मता नृणाम् ।
तस्मादनर्थमर्थाख्यं श्रेयोऽर्थी दूरतस्त्यजेत् ॥ १९ ॥
भागवत ११ वा स्कंद, अध्याय २३ वा, श्लोक १८ व १९
चोरी हिंसा तसे खोटे दंभ काम नि क्रोध तो ।
अहंकार तसा गर्व स्पर्धा भेद नि वैर ते ॥ १८ ॥
अविश्वास तसा लोभ जुगार मदिरा तशी ।
अर्थाचे हे अनर्थोची ज्ञात्याने सोडिणे असे ॥ १९ ॥
स्मयः, मदः, भेदः, वैरं, अविश्वासः, – चोरी, हिंसा, असत्य, दंभ, काम, – स्तेयं, हिंसा, अनृतं, दंभः, कामः, क्रोधः, – क्रोध, आश्चर्य, उन्माद, भेदवृत्ति, शत्रुत्व, अविश्वास, – संस्पर्धा, व्यसनानि च – स्पर्धायुक्त मत्सर आणि स्त्री, मद्य, द्यूत ही तीन व्यसने. ॥ १८ ॥ एते अर्थमूलाः पंचदश अनर्थाः हि – मिळून १५ अनर्थ द्रव्यापासून उत्पन्न होतात – नृणां मताः – असे जनमत आहे – तस्मात् – म्हणून – श्रेयोर्थी – कल्याणेच्छु जो त्याने – अर्थाख्यं अनर्थं – द्रव्यनामक अनर्थ – दूरतः त्यजेत् – दुरूनच टाकून द्यावा. ॥ १९ ॥
चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे पंधरा अनर्थ मुनष्यांच्या ठिकाणी धनामुळेच होतात, असे मानले गेले आहे म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे, त्याने अर्थ नावाच्या अनर्थाला लांबच ठेवावे. (१८-१९)