ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.722

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२२

व्यक्ताव्यक्त दिठी घालूनि कल्पांता । कल्पना नुरेचि तेथे आतां ॥१॥ पाहणियाचा प्रपंचु पाहातां । निमाला कवणा बोलू ठेऊ आतां ॥२॥ दुजें म्हणो जाय तव मी माजीं हारपे । न वर्णवे तुझी सत्ता रया । गोडियेचे गोडपण गोडी केवी मिरवी । तुजमाजी आसतां तें वेगळीक रया ॥३॥ निशी जागरणी निमाला की तंतुचि तंती आटला । रसीं रसु दुणावला तुझ्या ठायीं ॥४॥ तेथें कल्पनेसी मूळ विरोनियां पाल्हाळ । तैसें उभय संधीं तूं विदेही रया ॥५॥ यालागी बापरखुमादेविवरु विठ्ठलु उदारु । दिठीचे दिठीमाजी अंजन । सुखीं सुख दुणावले चौघां पडिलें मौन्य । येणे निवृत्तिरायें खुणा दाऊनियां सकळ । डोळ्यावीण दिठी प्रबळ रया ॥६॥

अर्थ:-
व्यक्ताव्यक्त अशा परमात्मस्वरुपावर पुष्कळ वेळ दृष्टि ठेवली असता त्याठिकाणी कल्पनाच उरत नाही? विचार करता करता पाहाणाऱ्याचा प्रपंचच नाहीसा होऊन जातो. आता त्याचा बोल कोणावर ठेवावा. परमात्मा आपल्याहून निराळा आहे. असे म्हणायला जावे तर आपला मीपणाच तेथें हरपून जातो. अशा परमात्म्याची सत्तेच वर्णन करता येत नाही. आनंदरुप असलेल्या परमात्म्याला मी आनंदरुप आहे असे कसे सांगता येईल? अशा परमात्म्यामध्ये मी लय पावलो असल्यामुळे मी तरी त्याचे वर्णन कसा करु शकेल. ज्याप्रमाणे पटांत तंतू आटतात. त्याचप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ति आदि भाव तुझ्यामध्ये आटून गेले. त्यामुळे रसस्वरुप तुझ्या ठिकाणी रसरुप आनंद दुणावला आहे.कल्पनेचे पाल्हाळ तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी समूळ आटून गेले. त्यामुळे जीव परमात्म्याच्या ऐक्य बोधांत तूं विदेही आहेस? माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते उदार आहेत. त्यांनी जर आपल्या ज्ञानाचे अंजन भक्ताच्या डोळ्यांत घातले. तर ब्रह्मसुख दुप्पट होऊन जाईल. याचा अर्थ सुखस्वरुप स्थिती होईल. ज्याच्या स्वरुपाविषयी चारी वेदांना मौन धरावे लागते. अशा परमात्मस्वरूपाविषयी निवृत्तिरायांनी सर्व खूण दाखवून चर्मचक्षु वांचून माझी ज्ञानदृष्टि प्रबल केली.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *