भाग – २.
ज्ञानदेव म्हणाले,नामया!तुम्हीच असा विलाप करुं लागलात तर बाकीच्यां ना कोण सावरणार?भागवत धर्माच्या झेंड्याखाली सारा बहुजन समाज एकत्र आणुन आध्यात्मिक लोकशाहीचं,भक्तीचं राज्य उदयास आणलं आणि वारकरी धर्म पुनर्जीवित केला,हे माझं जीवित कार्य संपल्यावर,आपला वारसा दुसर्या वर सोपवुन समाधीस्त होणं योग्य नाही कां?नामदेवांनी अश्रूभरल्या नयनांनी मुक संमती दर्शवली.नंतर सहभोजन झाले.इंद्रायणीच्या काठी आर्त स्वरांत विठूरायाचा कारुण्याची किनार असलेला गजर झाला.आणि संतांमधे श्रेष्ठ,अद्वैता चं मर्म जाणणार्या नामदेवांचे ह्रदयस्पर्शी किर्तन झाले.चौथ्या प्रहरी निवृत्तीनाथानी मिठीत विसावलेल्या ज्ञानदेवांना समाधी स्थानावर आणले.सोपानदेव हे सारं अगतिकतेने,विकलतेने,दुःखी मनाने बघत होते.ह्रदयात कालवाकालव होत होती.निृवत्तीनाथ ज्ञानदेवांच्या हाताला धरुन जात असतांना छोट्या वळणावर,
साक्षात विठ्ठल उभा होता,पुढे होऊन त्याने ज्ञानदेवांचा दुसरा हातास धरले. मुक्ताईचा हात धरुन सोपनदेव त्यांच्या मागुन अतिव दुःखाने,निराशेने चालत होते.
गुहा आली तसे ज्ञानेश्वरांनी अफाट पसरलेल्या भक्तसागराला दोन्ही हात जोडुन अभिवादन केले.निवृत्तीनाथां ना कडकडुन मिठी मारली.त्यानंतर सोपान,मुक्ताईला आपल्या मिठीत घेतले. मुक्ताबाई तर टाहो फोडुन रडत होती.
आणि सोपानांना तर त्यांच्या मिठीत मृत्यु यावासा वाटत होते.मिठी सैल झाली. त्यांच्यातल्या भातृत्वावर,माऊलीने, योगी राजाने मात केली आणि दोघांना मिठीतुन दूर केले.गुहेत प्रवेश करुन चबुतर्यावर त्यांनी पद्मासन घालुन डोळे मिटले ते कधीही न उघडण्यासाठी.सर्व बाहेर आल्यावर निवृत्तीनाथांनी गुहेच्या मुखाची शिळा लावली.विठूरायाचा आणी ज्ञानदेवांचा गजर करीत जड अंतःकरणाने व अश्रूभरल्या डोळ्यांनी सर्वजण घरी परतले.सोपानदेव मात्र त्या चैतन्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा आठवत,शोधत,आठवणींना अभिषेक करत इंद्रायणीच्या घाटावर बसुन राहिले.
अश्रूंच्या सोबतीने व जुन्या आठवणींनी!
त्यांना आठवले लहानपणी मुक्ताईबरोबर भांडण झाले की,लगेच कसा समझौता होत असे व ते कौतुक विठ्ठलपंत व रुख्मिणी पाहत,दोघेही एकमेकांना देणारे प्रत्युत्तराने त्यांच्या विलक्षण बुध्दीची साक्ष पटत असे.
अनावधानाने पत्नीने दिलेली संमती गृहीत धरुन विठ्ठलपंतांनी संसार त्यागुन काशीला प्रयाण केले.तिथल्या श्रीपाद स्वामींकडुन सन्यास ग्रहण केला व चैत्यन्यस्वामी नाम धारण केले.कांही कालाने श्रीपादस्वामी तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले असतां सिध्देश्वर मंदिरात रुख्मिणीची भेट झाली.तीने या तेजपुंज स्वामींना वंदन केल्यावर,त्यांनी पुत्रवती भव असा आशिर्वाद दिला.
ती व्यथीत होऊन मुखावाटे हुंदका उमटल्या वर,स्वामींनी दुःखाचे कारण विचारल्या वर रुख्मिणीने सारी हकिकत कथन केली. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. ज्याला आपण सन्यासदीक्षा दिली तो दुसरा तिसरा कोणी नसुन चैत्यन्यस्वामी म्हणजेच या दुर्दैवी मुलीचा पती आहे. अनावधानाने कां होईना या दुर्देवी मुलीच्या दुःखास आपण कारणीभूत ठरलो ही बोच लागल्यामुळे त्यांनी तीर्थ यात्रा रद्द करुन काशीस परतले आणि तात्काळ विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रम स्विकारण्याची आज्ञा केली.हे धर्मबाह्य कृत्य झाले असे वाटल्याने कर्मठ धर्मपीठाने वाळीत टाकुन गावगाड्याच्या दैनंदिन कार्यक्षेत्रातुन त्यांना बहीष्कृत केले.
विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्विकार ल्यानंंतर त्यांना निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाल्यावर त्यांना अधिकच क्लेश,त्रास सहन करावा लागला.त्यातुन ती अजान बालकें सुध्दा समाजाच्या तिव्र उपहास आणि अवहेलनेतुन सुटली नाही.आयुष्य जगणे कठीण झाल्यावर विठ्ठलपंत पत्नीमुलां सह त्रिम्बकेश्वरला जाण्यास निघाले असतां वाटेत ब्रम्हगिरी पर्वताच्या जंगलात वाघाची गर्जना ऐकु आल्याने सर्वांची चुकामुक झाली.निवृत्तीनाथ एका गुहेत शिरले.तिथे त्यांची गहनीनाथांची भेट झाली.गहनीनाथांनी संपूर्ण हटयोगाची दीक्षा देऊन त्यांना ब्रम्हज्ञानी बनवले.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

[…] प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव […]
[…] प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव […]