संत सोपानदेव चरित्र ११

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – ११.

अनुक्रमणिका


चारही भावंडंनी एकमेकांच्या हाता वर हात ठेवल्यावर,ज्ञानेश्वर म्हणाले,आई बाबा!आम्ही चौघेही या गंगेच्या साक्षीने तुम्हाला वचन देतो की,धर्मशास्राचा न्याय्य अर्थ लावुन सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याची तुमची संकल्पना पूर्ण करु ज्या धर्मसभेने तुम्हाला देहान्त प्रायश्चित दिले,त्याच धर्मसभेत तुमचा ससन्मानानं उल्लेख होईल असं लौकिक कार्य करुन दाखवु.ज्या शुध्दीपत्रासाठी तुम्ही दोघांनी आत्मसमर्पन केलं तेच शुध्दीपत्र ही धर्म सभा स्वतः आम्हाला बहाल करतील. आम्ही एकोप्यान,एकदिलानं राहु आणि मुक्ताईचा काळजीपुर्वक सांभाळ करु.

आमचं कार्य कर्तुत्वानं आपल्या कीर्तीचा ध्वजा शतकानुशतके फडकत राहिल असा आशिर्वाद सदैव असु देत.ज्ञानेशां च्या प्रत्येक वाक्याला सोपानांचा हुंदका आणि निवृत्तींच्या स्पर्शातुन संमती दर्शवत होती.आईबाबा शुभास्ते पंथानः।”

आईबाबांच्या पिंडाला काकस्पर्श झाला होता.या चौघांनी आईबाबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी सगळी पंचमहाभूतं अवघ्या सामर्थ्यानिशी त्यांच्या पाठीशी उभी राहणार होती.जणूं ज्ञानेशाचे शब्द अजुनही अवकाशात प्रति ध्वनित होत होते.तसेच तिथे जमलेल्या लोकांच्या मनांतही!त्या शब्दांचं सामर्थ्य अस होतं की,या कुटुंबाची छीः थू करणार्‍यांच्या मनाचा थरकाप झाला.ही चार भावंडं म्हणजे चार दिव्य शक्ती आहे याची झलक या प्रसंगातुन लोकांना बघायला मिळाली,
निवृत्तीनाथ गुडघाभर पाण्यात उभे राहुन,ओंजळीत पाणी घेऊन अर्ध्य दिलं.

आतां इथे कुणी ब्राम्हण न आल्यामुळे, पितरांना हविर्भाग कसा मिळेल?यावर सोपान म्हणाले.ब्राम्हण जेवणार ते आई बाबांचं प्रतिकात्मक रुप म्हणुनच ना?तर प्रत्यक्ष आईबाबाच येतील हविर्भाग घ्यायला.कावेरीआक्का!तुम्ही वाढुन ठेवा असं म्हणुन सोपान पाण्यात जाऊन उभे राहिले आणि हाका मारुं लागले,आई बाबाss या लवकर जेवायला.मघाशी तुम्ही शब्द दिला होता.या लवकरsss हा हविर्भाग घेऊन मगच मोक्षप्रद जाss! आईss बाबाss आतां त्यांच्या स्वरांत आर्तता येऊ लागली.बर्‍याच हाका मारुन झाल्यावर मात्र सोपान हुंदके द्यायला लागले.सगळीकडे स्तब्धता पसरली.काय नव्हते त्या स्तब्धतेत?व्याकुळता,खिन्नता दुःख,वेदना,विरह,व्यथा सारं कांही होतं. दुसर्‍याच क्षणाला इंद्रायणीचं पाणी खळवळलं.अंतर्मनांंत दडलेलं,जलगर्भात लपलेलं कांहीतरी बाहेर येऊन आपलं अस्तित्व दाखवु पाहतय असं वाटायला लागलं.लाटांचं उसळणं,खळबळ वाढली.

जमलेल्या लोकांमधे धास्ती निर्माण झाली.हे पाणी प्रलंयकारी रुप घेते की काय अशी भिती वाटुं लागली.पण सोपान शांत होते.त्यांच्या डोळ्यांतुन पाणी वाहत होतं पण समाधानाचं!निवृत्ती-ज्ञानदेवांनी बघीतलं,सोपानाच्या पाठोपाठ तरल अवस्थेत चार पावलं जोडीने सोपानाच्या मागुन चालत वेदी पर्यंत आले.वेदीजवळ चार पाटं मांडले होते.दोन रिकामे व दोन पाटांवर दर्भ ठेवला होता.चारही पात्रावळीवर सारा श्राध्दपाक वाढलेला होता.दोन रिकाम्या पाटांजवळ सोपान हात जोडुन उभे राहिले.त्यांच्या बाजुस निवृत्ती,ज्ञानदेव, मुक्ताई पण हात जोडुन उभे होते.

हवेसारखी तरल एक हलकी चाहुल चौघांच्या समोरुन गेली.त्या दोन्ही पाटांवर क्षणभर पावलांचे ठसे उमटले, पण क्षणभरच!सोपानांना हुंदका फुटला. हमसुन हमसुन रडु लागले,ते पाहुन तिघेही रडुं लागले.स्वतःला आवरुन जरबेनं निवृत्ती म्हणाले,पुसा डोळे!आपण आईबाबांना शब्द दिलाय!त्यांच्या मोक्षप्राप्तीची वेळ झालीय!एकवार नमस्कार करा.सगळेच सावरले.डोळ्यांत अश्रू होते पण,चेहर्‍यावर समाधान!श्राध्द दशक्रीया विधी पार पडला.सगळे घरी आले.सोपान,मुक्ताईला खुप कांही विचारायचे आहे हे लक्षात आल्यावर, निवृत्ती म्हणाले,मुक्ते विचार काय विचारायच ते!दादा! पिंड उचलण्यासाठी कावळाच कां लागतो?इतर पक्षी कां नाही?ते म्हणाले,कावळ्याला एक अतिद्रिंय शक्ती लाभली आहे.मरणार्‍या माणसाची जर कांही इच्छा अपुर्ण राहिली,तर अतृप्त आत्मा पिंडीभोवती वावरत असतो.इच्छापुर्तीचं वचन मिळालं की,आत्मा बाजुला होतो.मग कावळा पिंडीला स्पर्श करतो,म्हणजेच तो जिवात्मा वासमामय देहापासुन मुक्त होतो.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading