रामायणातले संस्कृतीदर्शन भाग 16

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

रामायणातले _संस्कृतीदर्शन 🌼भाग क्र16 🌼
🌷वास्तुशांतीची संस्कृती व रामचंद्रांच्या मांसाहार भक्षणाचे खंडन 🌷


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकीरामायणातले संस्कृतीदर्शन पाहु.अयोध्याकांडापासुन आपण हा विषय अभ्यासतोय.
मागील भागात आपण राम लक्ष्मण व सीतेने केलेले गंगापूजनाचे नवस व गंगामैया हि सुरापान व मांसभक्षण करते या आक्षेपांचे खंडन पाहिले आज पुढिल भाग पाहु.
रामचंद्रांनी गंगापार केली व मजल दरमजल करत ते प्रयागक्षेत्री गंगायमुनेच्या संगमावर भरद्वाज ऋषिंच्या आश्रमात पोचले तेथे ऋषिंचे आशीर्वाद घेवुन रात्री निवास करुन भरद्वाज ऋषिंकडे त्यांनी वनवासाकरता योग्य स्थान कोणते राहिल या विषयी चर्चा केली व त्यांनी चित्रकुट पर्वत हे स्थान त्यांना निवासाकरता सुचवले.विविध तपस्वी, साधु, पशु पक्षी पाण्याचे साठे व फुले फळे कंदमुऴे यांची त्या ठिकाणी विपुलता होती अनेक सत्पुरुष त्या ठिकाणी दृश्य व अदृश्य रुपात तपाचरणकरत असल्याने ती तपोभूमी हि होती.


अशा तपोभूमीत तप:साधना योग्य होईल व त्याच सोबत कुटुंबाचे पोषण हि तापसी वृत्तीने होईल हि जागा अयोध्येपासुन दुर असल्याने या स्थानी नगरजन भेटण्यास येणार नाहित व त्यांनी हि युवराजाची अवस्था पाहुन दु:ख होणार नाहि असे हेतु यात होते.
रामांनी लक्ष्मणास आज्ञा दिल्यानंतर लक्ष्मणाने लाकडे फांद्या गवत पाने वगैरे जंगलातुन तोडुन आणली लाकडाच्या भिंती उभारुन त्यावर गवत व पानांचे आच्छादन करुन पर्णकुटि बनवली
ऐणेयं मांस माहृत्य शालां यक्ष्यामहे वयम् ।
कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीविभि:।। (56-22)
हे सौमित्र आपण ऐणेयं म्हणजे गजकंदाचा मांसलभाग आणुन या पर्णशालेच्या वास्तुमंडल देवतांचे पूजन करु कारण दीर्घायुष्य प्राप्त व्हावे या करता वास्तुशमन (वास्तुशांत) करावी.


नवीन घर, पर्णशाला (झोपडि), गोठा बांधला कि वास्तुशांत करावी असे ऋग्वेदाच्या आश्वलायन गृह्यसुत्रात दिले आहे वास्तुशांत करण्याची संस्कृती फार जुनी आहे.आपण घर बांधतो त्या वेऴी जमीन खणणे, दगड फोडणे,झाडेतोडणे हे होते जमिनीत अनेक किड्या मुंग्या वाऴवी यांची घरे (वारुऴे) असतात.दगडाखाली अनेक जीव जंतु वास्तव्य करतात व झाडावर अनेक पक्षी राहतात .आपल्या घर बांधण्यामुऴे या प्राण्यांची हत्या होते व त्यांचे घर आपल्यामुऴे उध्वस्त होते हा दोष निरसन व्हावा व वास्तुची शुध्दता व्हावी सुख नवीन जागेत धनधान्य पुत्रपौत्रवृध्दि व्हावी या हेतुने वास्तु शांत करतात.
मत्स्य व ब्रह्म पुराणात वास्तुशांतींबद्दल सांगोपाग माहिती दिलीय
मृगं हत्वाऽऽनय लक्ष्मणेह शुभेक्षण।
कर्तव्य:शास्त्रदृष्टो हि विधिधर्ममवुस्मर ।।23


कल्याणदर्शी लक्ष्मणा तु गजकन्द नामक वनस्पति खणुन शीघ्र घेवुन ये कारण विधियुक्त अनुष्ठान करणे हे आपले कर्तव्य आहे.तु देखील सदैव धर्मचिंतनात राहा.
स लक्ष्मण:कृष्णमृगं हत्वा मेध्यं प्रतापवान् ।अथ चिक्षेप सौमित्रि:समिध्दे जातवेदसि ।। रामांच्या अाज्ञेनुसार तो पवित्र (मेध्य) व काऴी साल असलेला गजकंद प्रतापी सौमित्राने खणुन (हत्वा) प्रज्वलीत अग्नित टाकला.
त तु पक्वं समाज्ञाय निष्टप्तं छिन्नशोणितम्।
तो कंद अग्नित व्यवस्थित भाजलेला पाहुन
रामचंद्रांनी स्वत:मंत्र म्हणुन वास्तु देवतांना या पक्व कंदाचा नैवैद्य दाखवला.
अयं सर्व:समस्ताङ्ग:कृष्णमृगोमया।
देवता देवसंकाश यजस्व कुशलोह्यसि ।।28
लक्ष्मण म्हणतात हा काऴे ठिपके असलेला गजकंद मी पूर्ण शिजवला आहे आता आपण त्याचा वापर करुन वास्तुशमन करा.
या श्लोकांचा विपर्यास कसा करतात ते पाहा.
गजकंद याचा अर्थ हत्तीचे मांस व एणी कृष्ण मृगयो:या शब्दाचा दुसरा अर्थ काऴ्या ठिपक्याचे हरीण असा लावल्याने रामाने मांसाचा नैवेद्य दाखवला त्यामुऴे ते मांसभक्षक होते असा अर्थ लावला जातो.
संस्कृत हि एकमेव भाषा आहे ज्यात योग्य अर्थबोध होण्याकरता मागील व पुढिल संदर्भ हे मीमांसा करुन पाहणे आवश्यक ठरते मागील भागात या संदर्भाने काहि उदा.दिली होती.


याचा समन्वय व योग्य अर्थ कसा घ्यावा ते पाहा.
या आधीचे आपण भाग पाहिलेत तर रामांनी वनवासात तापसी वृत्तीने राहण्याचा व केवऴ फळ मुऴे कंद भक्षणकरेन असा संकल्प केला होता. “फलानि मुलानि च भक्षयन् वने “(2-34-59)
तसच धर्ममेवाचरिष्यामस्तत्र मूल फलाशना:(2-54-16) या वचनांनी रामचंद्रानी वनात कंद फळ मुऴे खावुन धर्माचरण करेन हि प्रतिज्ञा केलीय व तसच ते आचरण करताहेत निषाद राजा गुहाने दिलेले पंचपक्वान त्यांनी यास्तवच नाकारले आहे हे अापण मागील भागात पाहिलेय
बर पुढे भरत भेट प्रसंगात दशरथ राजांच्या मृत्युची बातमी रामचंद्रांना समजल्यावर त्यांनी कंदमुऴांचे पिंड करुन दशरथ राजांचे श्राध्द केल्याचा उल्लेख आहे त्यावेऴी त्यांनी आम्हि जे भक्षण करतो त्याचेच हि पिंड आपण स्विकारावेत हि प्रार्थना हि केलीय.म्हणजेच वनात असताना रामचंद्र अन्न म्हणुन कंदमुऴे हाच आहार भक्षण करत होते.
रामचंद्राचे वर्णन करताना “रामो द्विर्नाभिभाषते “अस वाल्मिकी म्हणताहेत याचा अर्थ रामांनी एकदा दिलेला शब्द तोच अटळ आहे ते दुतोंडि बोलत नाहित ते एकवचनीच आहेत मग जर ते मांसाहारी होते अस सिध्द करणारी मंडऴीना राम हे एकवचनी होते याचा विसर पडलाय
आपला चुकीचा सिध्दांत पुढे रेटण्याकरता ते रामचंद्र हे एकवचनी व वचनप्रिय होते हे असत्य ठरवताहेत वनवासात जाताना त्यांनी कंदमुऴे भक्षण करेन, वल्कले नेसेन, वडाचा चीक वापरुन मस्तकी जटा धारण करेन हा संकल्प केला होता तो खोटा कसा ठरेल?
रामचंद्रांनी वास्तुमंडल देवतांना या कंदाचा नैवेद्य व अष्टदिक्पालांना याचाच बलीभाग दिला.वैश्वदेव देखील रामांनी याच कंदाने केला रुद्र व विष्णु देवतांचे यजन हि त्यानी स्वत:मंत्र जप करुन हा कंदभाग देवुन केले.
आता एखादा नास्तिक पटकन विचारेल मग यांनी हवना करता तुप समिधा पूजन सामग्री कशी जमवली तर याचे उत्तर आहे रामांनी त्या देवतांना उद्देशुन मंत्र जप करुन हा भाग अर्पण केला (हा सर्वात गौण पक्ष आहे) प्रत्यक्ष अग्नि नसेल तर पाण्यात देखील आहुती देता येते (हा अपवाद नियम आहे) अतिवृष्टि समयी जलाशयात भस्माच्या आहुती दिल्या कि अतिवृष्टि थांबते.चटश्राध्दात अग्नौकरण (भाताच्या आहुती) देखील पाण्यात देतात. धर्मशास्त्रात अनेक पर्याय हे अपवादात्मक स्थितीकरता दिले आहेत त्यांचा वापर करुन आचरण करता येते.
आता या ऐणेयमांसम् व छिन्न शोणितम् याचा खरा अर्थ कसा लावावा हे पाहा.
मदनपाल निघण्टु नावाचा एक औषधी वनस्पतींचा ग्रंथ आहे त्यात
ऐणेय मांसम् याचा अर्थ गजकंद नामक वनस्पति चा कंद असा अर्थ आहे.
छिन्न शोणितम् याचा अर्थ पुढे सांगताना” छिन्नं शोणितम् रक्त विकाररूपं रोगजातं येन स:तम्”अशी व्याख्या स्पष्ट दिलीय .मदनपाल निघण्टुकार पुढे म्हणतात षड्दोषादि कुष्ठहन्ता असा याचा विनियोग सांगतात हा षड् रोग चर्मरोग व कुष्ठरोगा आदि रक्त विकारांचा नाशक आहे .
आयुर्वेदात काहि वनस्पतिंची नावे हि प्राण्यांप्रमाणे भासतात
उदा.मयुरक- आघाडा, सर्प – सर्पगंधा, महिष – गुग्गुऴ, अश्व – अश्वगंधा, वृषभ – वृषभकंद,नकुल, मेष अशी नावे सुश्रृत व भावप्रकाश या ग्रंथात या वनस्पतिंची नावे, रूप, गुण वगैरेंचे वर्णन आहे.
आता याचे उदा.पुरावा म्हणुन देतो


अपक्वे चूतफले स्त्राय्वस्थिमज्जान: सूक्ष्मत्वान्नोपलाभे पक्वे त्वाविर्भूता उपलभ्यन्ते ।। (आंबा कच्चा असताना सूक्ष्म रुपामुऴे त्याचे स्नायु, हाडे, मज्जा दिसत नाहित पण तो पक्व झाला कि हे सर्व प्रकट होते)
फळांच्या गराला मांस, सालीला चर्म, बी ला अस्थि व फळांच्या रेषांना स्नायु म्हणतात.
बृहद् आरण्यक उपनिषदात गर्भ धारणेच्या विधिमधे विद्वान पुत्र पोटि जन्मावा या करता “वृषौदन “भक्षण करण्यास सांगीतलय याचा योग्य संदर्भ हा राजनिघण्टु या आयुर्वेदाच्या ग्रंथात पाहावा लागतो.
ऋषभो गोपतिर्वीरो विषाणी धूर्धरो वृष:। ककुद्मान् पुङ्गवो वोढा श्रृङ्गी धुर्यश्च भूपति:।।
वृषभ, वीर, गोपति, वृष, श्रृंगी, ककुद्मान, विषाणी या नावांचा अर्थ बैल असा शब्दश: घेतल्याने “वृषभमांस “हि चुकीची कल्पना त्यात घुसडली गेली वास्तवात हा वृषभकंद आहे जो संततीकरता फलप्रद आहे (साधारण लसुणाच्या कांद्या प्रमाणे हा दिसतो)
योग्य अर्थ योग्य समन्वयानेच निघतो.


मयुरशिखा हा एक धुपाचा प्रकार आहे याचा शब्दश:अर्थ मोराचा तुरा घेतला व त्याचा विनियोग केला तर त्याचा लाभ होत नाहि पण मयुरशिखा म्हणजे आघाड्याचा तुरा हा अर्थ घेवुन तो वापरला तर गुण पडतो .
तेव्हा शब्दश:अर्थ घेणे हे बरेचदा अयोग्य ठरते तेव्हा योग्य समन्वय साधुन अर्थ लावणे हे संयुक्त ठरेल.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading